
चांगभलं ऑनलाइन | मुंबई
बीडमध्ये एका आमदाराचे घर काही अज्ञात व्यक्तींनी जाळले. लोकप्रतिनिधींची घरे पेटवून दिली जात आहेत, अशा वेळी राज्याचे गृहमंत्री कुठे आहेत? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुर्णतः ढासळली आहे. हे गृहमंत्री आणि ट्रिपल इंजिन खोके सरकारचे पूर्णपणे अपयश आहे. गृहमंत्री अपयशी ठरले आहेत. गृहमंत्र्यांनी(devendra Fadnavis) तातडीने राजीनामा द्यावा., अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
त्या म्हणाल्या, मराठा आरक्षणासंदर्भात ४० दिवसांत निर्णय घेऊ असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. जी परिस्थिती आज ओढावली आहे. त्याला ट्रिपल इंजिन खोके सरकारच जबाबदार आहे. त्यांना खोके घ्यायला वेळ आहे. पण मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यायला वेळ नाही. या सगळ्या जातसमूहांची फसवणूक करण्याचे पाप भाजपाने केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळली आहे. त्याला ट्रिपल इंजिन खोके सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्रात आज अस्थिर वातावरण आहे. लोकांना फसवायचे, सत्तेचा गैरवापर करायचा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यामाध्यमातून लोकांना छळणे, हे काम केले जात आहे. प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेसाठी या ट्रिपल इंजिन खोके सरकारला वेळ नाही, अशी खरमरीत टीका खा. सुप्रिया सुळे यांनी राज्यातील आघाडी सरकारवर केली आहे.