तमाशा अन् सांगली जिल्ह्याचं काय आहे नातं? – changbhalanews
आपली संस्कृतीकलारंजन

तमाशा अन् सांगली जिल्ह्याचं काय आहे नातं?

'मोहना बटाव' ; पेडमधील दुर्लक्षित समाधीची अनटोल्ड स्टोरी

चांगभलं ऑनलाइन | Sangali News
सर्व प्रकारच्या कलांचा संगम ज्या कलाप्रकारात होतो तो लोककलेचा कलाप्रकार म्हणजे तमाशा. अशा तमाशा परंपरेचा जेव्हा आपण शोध घेतो तेंव्हा आपल्याला सुमारे २०० वर्षे पाठीमागे जावे लागते. १८६०  च्या दशकात तमाशा या लोककला प्रकाराला प्रारंभ झाला असे तमाशा अभ्यासकांनी लिहून ठेवलेय.  तमाशाचा पहिला प्रकार  म्हणजे भेदिक तमाशा. त्यानंतर लौकिक तमाशा आला आणि पुढे लोकनाट्य तमाशा अशी यात चढती कमान राहिली. या स्थित्यंतरामध्ये सांगली जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे. त्यातून भेदीकचा रंगीत तमाशा झाला आणि “मोहना बटाव”ची निर्मितीही एका सांगलीकर कलावंतांच्या नावावर नोंद झाली. मात्र दुर्दैवाने आजवर या वगसम्राटाची समाधी मात्र दुर्लक्षितच राहिली आहे.
पेशवाईच्या अस्तानंतर तमाशा हा लोकाश्रयावर अवलंबून राहू लागला. त्यातून श्रृंगारिक लावण्या, सामाजिक लावण्या, पोवाडे गाणी, छक्कड असे प्रकार राहिलेले आपल्याला आढळून येतात. भेदिक शाहिरी मध्ये तमाशाचे आपल्याला मूळ आढळते. खरंतर भेदिक शाहिरी व पेशवेकालीन शाहिरी यात कलगी आणि तुरा या दोन पक्षांचे शाहीर सवाल-जबाब आतून गण गवळण लावण्या छक्कड हे काव्यप्रकार सादर करीत असत. यातूनच पुढे भेदिक तमाशा आणि लौकिक तमाशा नावारूपाला आला.  पुसेसावळीचे कलगी पक्षाचे शाहीर हैबती घाडगे व भिलवडीचे तुरा पक्षाचे शाहीर शंभू गोष्टी राजू तांबोळी यांच्या शिष्यांनी तमाशाची पहिली मुहूर्तमेढ सांगली जिल्ह्यात रोवली. म्हणूनच सांगली जिल्हा जसा नाट्य पंढरी म्हणून ओळखला जातो तसाच तमाशापंढरी म्हणून सुद्धा ओळखला जातो. सन १८६० ते ७० च्या दशकात भेदिक शाहीर शंभू राजू गोष्टी भिलवडीकर यांच्या घरी म्हशी राखण्याचे काम उमाजी बाबू मांग कांबळे सावळजकर हे करत होते. याच शिष्याने पुढे तमाशाचा बाज बदलला व भेदिक तमाशाचा रंगीत तमाशा बनवला. याला साथ दिली ती बाबाजी साठे पेडकर या त्यांच्या मित्राने. म्हणूनच उमा बाबा सावळजकर या नावाने तमाशाची खरी सुरुवात सांगली जिल्ह्यातून झालेली आहे असे जुने लोक सांगतात.
प्रचंड गाजला होता ‘मोहना बटाव’
या तमाशाचा पहिला वग बाबा साठे पेडकर यांनी काल्पनिक अशा व्याख्यान पर लावणीतून रचला. त्याचे नाव होते “मोहना बटाव”. पुढे महाराष्ट्रातल्या अनेक तमासगिरांनी बटावाचा वग म्हणून याच वगाचे अनुकरण केले. बाबाजी साठे पेडकर यांनी लिहिलेला मोहना बटाव हा पहिला वग त्या काळात प्रचंड गाजला. होता. म्हणूनच म्हटले जाते की सांगली जिल्ह्यातील भिलवडीचे तुरा पक्षाचे शाहीर शंभू गोष्टी राजू तांबोळी भिलवडीकर आणि पुसेसावळीचे कलगी पक्षाचे शाहीर हैबती घाडगे पुसेसावळीकर यांचे शिष्य उमाजी कांबळे सावळजकर आणि बाबाजी साठे पेडकर यांनी तमाशाची पहिली मुहूर्तमेढ सांगली जिल्ह्यात रोवली. हा सांगली जिल्ह्याच्या लोककलेचा अभिमानास्पद इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आधुनिक तमाशाचे पहिले उद्गाते उमाजी कांबळे सावळजकर आणि बाबाजी साठे पेडकर यांचे कार्य लोककलेच्या अभ्यासकानी आम जनतेसमोर आणले पाहिजे. उमाजी सावळजकराचा साथीदार बाबाजी साठे वग लिहिण्यात अतिशय हुशार होता. त्याने लिहिलेला पहिला वग मोहना बटाव, याबरोबरच राजा हरिश्चंद्र व लक्ष्मी हे वग अत्यंत गाजले होते.

बाबाजींची पेडमधील समाधी अद्याप दुर्लक्षित
विसाव्या शतकाच्या प्रारंभी सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी १९०२ साली बाबाजी साठे यांचे चिरंजीव चंदू साठे यांनी आपल्या बापाची समाधी पेड येथे बांधली. त्यांच्या पुढील पिढ्यातील वारसांनी ती समाधी आजही जतन करून ठेवलेली दिसते. मात्र महाराष्ट्रातील या पहिल्या आधुनिक तमाशा कलावंताची  समाधी अत्यंत दुर्लक्षित असून पेडगावात रस्त्याच्या एका बाजूला गटारीला लागून दुरावस्थेमध्ये ती आपल्याला पहायला मिळते.
दरम्यान, प्रबोधन न डाव्या पुरोगामी चळवळीतील नेते काॅ. मारुती शिरतोडे, शिक्षक संघटना समन्वय समितीचे बाबासाहेब लाड, पत्रकार दीपक पवार, डाव्या पुरोगामी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते देवकुमार दुपटे आणि पेड येथीलच रहिवासी असलेले जुने तमाशा कलावंत सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक बाळासाहेब चव्हाण आदींच्या समवेत या समाधीला नुकतीच भेट देवून बाबाजी साठे यांच्या लोककलेतील योगदानाची माहिती जाणून घेतली.

सांस्कृतिक संचालनालयाने समाधीचा जिर्णोद्धार करावा
        ” सांगली जिल्ह्याचतील पेड (ता. तासगाव) गावाला एवढा मोठा लोककलेचा ऐतिहासिक वारसा असून सुद्धा दिवंगत बाबाजी साठे यांच्या या समाधीकडे समाजाचे आणि शासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. समाधी दूरावस्थेत आहे. ही बाब लोककलेचे अभ्यासक, लोककलावंत आणि कलारसिक यांना अस्वस्थ करणारी आहे. या समाधीचा जीर्णोद्धार व सुशोभीकरण महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाने हाती घ्यायला हवे. आजच्या तमाशा फड मालकांनी यामध्ये लक्ष घालावे. प्रसंगी समाजातील लोककला अभ्यासक आणि कलावंतांनी यासाठी मोठे जन आंदोलन उभारावे.”
  – कॉम्रेड मारुती शिरतोडे, वाझर.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close