कोयना धरणात तीन महिन्यांत १४८.७३ टीएमसी पाण्याची आवक; ५७ टीएमसीहून अधिक विसर्ग, वीजनिर्मितीचा राज्याला लाभ

कराड │ चांगभलं वृत्तसेवा
कोयना धरणाच्या जलवर्षाची सुरुवात १ जूनपासून झाली असून, गेलेले ९२ दिवस पावसाची भरघोस आवकदार ठरले आहेत. या काळात तब्बल १४८.७३ टीएमसी (१४३.३१ टक्के) पाण्याची धरणात आवक झाली. धरणसाठा नियंत्रणासाठी आतापर्यंत सहा वक्री दरवाजे पाच वेळा उघडण्यात आले. या काळात विनावापर ४८ टीएमसी पाण्याचा विसर्ग, तसेच पायथा वीजगृहातून नऊ टीएमसी पाण्याचा वापर करून विसर्ग झाला. मिळून ५७ टीएमसीहून अधिक पाणी धरणातून कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
मान्सूनपूर्व व चालू पावसाळ्यात पश्चिम घाट व कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचे आगमन झाले. कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा यांसारख्या नद्यांना पूर आला. मात्र अतिवृष्टीमुळे खरिप हंगामाला मोठा फटका बसला असून उत्पादन घटण्याची व दर्जा खालावण्याची शक्यता आहे.
पर्जन्यमान व धरणसाठा…
१). मागील तीन महिन्यांत कोयना पाणलोटात ४,८६९.६६ मिमी (वार्षिक सरासरीच्या ९७.३९ टक्के) पाऊस झाला.
२). गतवर्षी याच काळात पर्जन्यमान ५,४९७.६६ मिमी (१०९.९५ टक्के) नोंदले गेले होते.
३). यंदा सर्वाधिक पाऊस नवजा येथे ५,२६५ मिमी, महाबळेश्वरला ५,०६६ मिमी, तर कोयनानगरला ४,२७८ मिमी झाला.
४). गतवर्षी हे आकडे अनुक्रमे ५,८६५ मिमी, ५,६३५ मिमी व ४,९९३ मिमी इतके होते.
५). सध्या कोयनेचा धरणसाठा १०२.३३ टीएमसी (९७.२३ टक्के) असून, गतवर्षी याच दिवशी तो १०३.९५ टीएमसी (९८.८३ टक्के) होता.
वीजनिर्मितीचा फायदा….
पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोयना जलविद्युत प्रकल्पातून राज्याला जादा वीज निर्मितीचा लाभ मिळाला आहे. गेल्या ९२ दिवसांत ५३६ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली असून, यामुळे महाराष्ट्र राज्याला मोठा फायदा झाला आहे.