
कराड | प्रतिनिधी
कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं चार राज्यातून गहाळ झालेल्या तब्बल दोन लाख रुपये किंमतीच्या 15 मोबाईलचा यशस्वी शोध घेऊन ते मूळ मालकांना परत मिळवून दिलेत. ‘मोबाईल गेला…पण पोलिसांनी परत मिळवून दिला’, अशी भावना महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, उत्तर प्रदेश चार राज्यातील मोबाईलच्या मूळ मालकांनी व्यक्त केलीय. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांच्या गहाळ मोबाईलचा शोध घेऊन ते परत देण्याच्या कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड शहर हे सातारा जिल्हयातील एक नामांकीत शहर व मुख्य बाजार पेठ आहे. त्यामुळे आजुबाजुचे गावातून दररोज हजारोच्या संख्येने लोक नोकरी, रोजगार व शिक्षणासाठी कराडमध्ये येत असतात. त्यावेळी प्रवासात, बाजार पेठेत व ईतर ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. एल. डांगे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अशा गहाळ झालेल्या मोबाईलची सायबर पोलीस ठाणेच्या माध्यमातुन माहिती प्राप्त केली. सदर माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन महाराष्ट्र राज्याचे विविध भागातून तसेच कर्नाटक, आंध्रा, उत्तर प्रदेश या राज्यातुन मोबाईलचा शोध घेवून मोबाईल धारकास त्यांचे माबाईल परत केले आहेत. गरिबीची परस्थिती असताना देखील कर्ज काढुन घेतलेले मोबाईल हरवले असताना त्यांचे मोबाईल परत मिळाल्याने जन सामान्यातुन कराड शहर डीबी पथका विषयी प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर., कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ, रईस सय्यद यांच्या पथकाने केली आहे.