
मुंबई, दि. २७ जून, चांगभलं | हैबत आडके
राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या महायुती सरकारच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील मराठी मनाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होऊ लागला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही आता एकत्र आक्रमक होत एका सामूहिक मोर्चाच्या तयारीत आहेत.
मनसेने ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानदरम्यान भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली असून राज ठाकरे यांनी यासंदर्भात अधिकृत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. या मोर्चात कोणता झेंडा नसेल, मराठीचा अजेंडा असेल, मराठी माणूसच नेतृत्व करेल, असं स्पष्ट करत राज ठाकरे यांनी या विषयावर तमाम मराठी बांधवांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. तर शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनीही आपल्या पक्षातर्फे मोर्चा काढण्याची घोषणा करून या लढ्याला जोर दिला आहे. मराठी व इतर भाषिकांमध्ये भाजप विषाचा खडा टाकण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रावर कदापी लादू देणार नाही, असं म्हणत पक्षीय भेदाभेद विसरून मराठी आणि महाराष्ट्रासाठी या लढ्यात सामील व्हा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी आज एक्स (ट्विटर) वर एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र चर्चा करत असलेला फोटो शेअर करत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जय महाराष्ट्र! There will be a single and united march against compulsory Hindi in Maharashtra schools. Thackeray is the brand!” विशेष म्हणजे ही पोस्ट त्यांनी भाजपनेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केली आहे.
त्याचबरोबर त्यांनी एक्सवर मराठीतही पोस्ट करून ठाम भूमिका मांडताना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा पाठीमागे असलेला व उद्धव ठाकरे व राज ठाकरे दोघे एकत्र असतानाचा फोटो शेअर करत लिहिलेय की, “महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!”
या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंमध्ये समन्वय दिसून येतोय. संजय राऊत यांचे हे एक्स वरील ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रिपोस्ट केल्याने ठाकरे बंधूमध्ये मराठीच्या मुद्द्यावर समन्वय होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राजकारणापलीकडे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना आणि मनसे एकत्र येताना दिसत असून, हे आंदोलन महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा निर्णायक क्षण ठरू शकते.
दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही काल राज ठाकरे यांची भेट घेतला होती. मात्र राज ठाकरे यांनी मंत्री दादा भुसे यांचा म्हणणं फेटाळून लावलं. त्यामुळे शासनाच्या पातळीवर या मुद्यावर नव्याने विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
📰 “विश्वासार्ह बातम्यांचा मंच– चांगभलं न्यूज!”
📲 Follow / Subscribe @ChangbhalaNews :
📷 Instagram ▶️ YouTube 🐦 X 📘 Facebook 🗞️ Dailyhunt
❤️ Like करा ↗️ शेअर करा 🔔 रहा अपडेट