
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
स्थलांतरित स्वरुपाचे जीवन जगणाऱ्या जात समूहांच्या अनेक तांडा वस्त्या कराड दक्षिणमधील विविध गावांमध्ये वसलेल्या आहेत. या तांडा वस्त्यांच्या सुधारणेसाठी भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे ५५ लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला आहे.
महाराष्ट्र राज्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गात अनेक जाती, जमाती असून, या जात समूहांमधील लोक अद्यापही भटकंती करुन स्थलांतरित स्वरुपाचे जीवन जगत आहेत. यामध्ये प्रामुख्याने लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहांचे तांडे अथवा वस्त्या असून, अशा तांड्यामध्ये या जाती – जमातीचे लोक अनेक वर्षांपासून राहत आहेत. मात्र स्थलांतरित असल्याने या वस्त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे याठिकाणी राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
ही बाब लक्षात येताच कराड दक्षिणमध्ये असलेल्या विविध गावांमधील तांडा वस्त्यांच्या सुधारणेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी इतर मागास बहुजन कल्याणमंत्री ना. अतुल सावे यांच्याकडे केली होती. डॉ. भोसले यांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत, इतर मागास बहुजन कल्याण विभागाने कराड दक्षिणमधील विविध ६ गावांमध्ये असलेल्या तांडा वस्त्यांना एकूण ५५ लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर केला आहे.
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत हा विकासनिधी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये कुसूर येथील धनगर वस्तीत आर.सी.सी. बंदिस्त गटर बांधकाम करणे (१० लाख), नांदलापूर येथील गोपाळ वस्तीत आर.सी.सी. बंदिस्त गटर बांधकाम करणे (५ लाख), धोंडेवाडी येथील माळवाडी, धनगर व कुडमुडे समाज वस्तीत माळवाडी वेताळबा विंग रस्ता ते पोपट भोसले ओढ्यापर्यंत गटर व रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख), तसेच धनगर वस्ती (दळेवाडी) येथे आर.सी.सी. गटर व रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० लाख), गोळेश्वरमधील शेंडगेवस्तीमध्ये बंदिस्त गटार बांधणे (४ लाख), पोतले येथील गोपाळ वस्ती पंतोजी मळा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे (६ लाख) आणि चचेगाव येथे टाकेवस्ती / जोशी वस्ती येथे बंदिस्त गटार करणे (१० लाख) या कामांचा समावेश आहे.
वंचित जातसमूह असलेल्या या तांडा वस्त्यांमध्ये सुधारणेसाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल इतर मागास बहुजन कल्याणमंत्री ना. अतुल सावे व या निधीसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल डॉ. अतुलबाबा भोसले यांचे या भागातील लोकांकडून आभार मानले जात आहेत.