नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण करा भरपाई आराखडे त्वरीत सादर करा- पालकमंत्री शंभूराज देसाई – changbhalanews
Uncategorized

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण करा भरपाई आराखडे त्वरीत सादर करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यात 20 ते 28 मे या दरम्यान एकूण सरासरी 294 मिमी पर्ज्यनमान झाले, मे महिन्यातील पावसाची ही टक्केवारी सर्वसाधारण 880 टक्‌यांपेक्षा जास्त आहे. माण, खटाव, फलटण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन घरे, रस्ते, पूल, पिके यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करुन भरपाईसाठीचे आराखडे त्वरीत सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपवनसंरक्षक आदीती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल अहिरे यांच्यासह पाटण, कराडचे उपविभागीय अधिकारी, विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
माहे मे मध्ये जिल्ह्यातील 50 महसूल मंडळांमध्ये 65 मिमीपेक्षा जास्त पर्ज्यन्यमान झाले आहे असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार या पावसाने 282 बाधित गावांमधील माण तालुक्यातील 27, फलटण तालुक्यातील 10 आणि महाबळेश्वर तालुक्यातील 1 अशा 38 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. तर जिल्ह्यातील 1826 घरांची अंशत: पडझड झाली असून 16 गोठे बाधित झाले आहेत. शेतपीकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले असून 6 हजार 190 शेतकऱ्यांचे 1 हजार 860 हेक्टर बागायती पिकांखालील क्षेत्र तर 17 शेतकऱ्यांचे 8 हेक्टरहून अधिक फळपिकांखालील क्षेत्र बाधित झाले आहे. या कालावधीत माण येथील 1 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून जावून मयत झाला आहे तर खटाव मधील एक व्यक्ती विद्युत शॉक लागून मयत झाला आहे. 18 लहान, 22 दुधाळ, ओढकाम करणारी 3 जनावरे मयत झाली आहेत. तर 150 कोंबड्याही मयत झाल्या आहेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही सुरु असून यंत्रणांनी युध्दपातळीवर काम करुन पंचनामे त्वरीत पूर्ण करावेत. भरपाईसाठीचे प्रस्ताव सादर करावेत.
गावापासून वाडीवस्तीला जोडणारे रस्ते, पूल यांचे नुकसान झाले असून त्यांच्या दुरुस्तीचेही प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी तात्काळ सादर करावेत, असे निर्देश देवून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्यांनाही शासन नियमानुसार भरपाई देण्यात यईल, जिथे जमीन खरवडून निघाली आहे त्या जमीनींसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करावेत. आपत्तीच्या काळात दरडी कोसळून घाट रस्ते बंद होऊ नयेत यासाठी जेसीबी, पोकलॅन सारखी यंत्रणा तयार ठेवावी, असेही निर्देश श्री. देसाई यांनी दिले.

20 मे ते 28 मे या कालावधीत झालेल्या पावसाची आकडेवारी तालुका निहाय पुढीलप्रमाणे, सातारा 305 मि.मी., जावळी- 340.4 मि.मी., पाटण-286.9 मि.मी., कराड 246.9 मि.मी., कोरेगाव -338.4 मि.मी., खटाव-292.9 मि.मी., माण-270.8 मि.मी., फलटण-367.3 मि.मी., खंडाळा 257.1 मि.मी., वाई 279.6 मि.मी., महाबळेश्वर-297.6 मि.मी. एकूण जिल्ह्यात 294.1 मि.मी. सरासरी पाऊस या कालावधीत झाला आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close