यशवंत विचार म्हणजे लोककल्याणाचा विचार मात्र हा विचार सांगणाऱ्यांच्या अवतीभवती सगळे भ्रष्टाचारी ; उदयनराजे भोसले यांची शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका
करवडी येथे कराड उत्तर मतदार संघाचा जनसंवाद मेळावा संपन्न

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
यशवंत विचार म्हणजे लोककल्याणाचे विचार. जे छ. शिवाजी महाराज, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार आहेत. मात्र प्रत्येक वेळी ‘यशवंत विचार’ , ‘यशवंत विचार’, असे सातत्याने म्हणणाऱ्यांना या लोकसभा मतदार संघात एक चारित्र्यसंपन्न उमेदवार मिळाला नाही . ते इतरांना यशवंत विचार सांगतात पण त्यांच्या अवतीभवती असणारी सगळी भ्रष्टाचारी लोकं आहेत, अशी बोचरी टीका भाजपा महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.
भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ शिवमंदार मंगल कार्यालय करवडी ता. कराड येथे मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी जनसंवाद मेळावा उत्साहात झाला. यावेळी उदयनराजे भोसले बोलत होते.
याप्रसंगी उदयनराजे भोसले यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, कराड उत्तर विधानसभा निवडणुक प्रमुख मनोजदादा घोरपडे , चित्रलेखा माने – कदम, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण, कराड तालुका सयोजक महेशकुमार जाधव, रयत क्रांती संघटना अध्यक्ष सचिन नलवडे, कराड तालुका अध्यक्ष शंकरराव शेजवळ, कुलदीपअण्णा शिरसागर , विक्रमबाबा कदम, दिपालीताई खोत, सीमाताई घार्गे, रुक्मिणी जाधव, नम्रता कुलकर्णी आदी मान्यवरांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
छ. श्नी. खा. उदयनराजे भोसले म्हणाले, यशवंत विचार सांगतात त्यांनी या मतदार संघात तब्बल चार सभा घ्याव्या लागल्या आहेत, याला ‘प्रेम’ म्हणतात.
मला भ्रष्टाचाराची, अन्याय अत्याचाराची प्रचंड चीड आहे. कोणावर अन्याय झाला तर मी सहन करत नाही , मी मारतो तर मारतोच , असे उदयनराजे यांनी परखडपणे सांगितले.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, छत्रपती उदयनराजे महाराज म्हणजे हाकेला धावणारा माणूस. नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला उदयनराजे महाराज यांना लोकसभेत पाठवायचे आहे. त्यासाठी सर्वांच्या साक्षीने सांगतो की, कराड उत्तर मतदार संघातून आम्ही जास्तीचे मताधिक्य देऊ. यावेळी धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.