आजाराचा ऑनलाईन सल्ला द्या पण औषधेही ग्रामीण भागात पोहोचवा
साताऱ्याच्या खासदारांची संसदेत मागणी

चांगभलं ऑनलाइन |कराड प्रतिनिधी
ग्रामीण भागात राहणाऱ्या रुग्णांना आजाराच्या निदानाचा ऑनलाईन सल्ला मिळाल्यानंतर ‘ई संजीवनी’ योजनेच्याद्वारे त्यांना घरपोच औषधे पुरवण्याची योजना केंद्र सरकारच्या दृष्टिक्षेपात आहे का? असा प्रश्न उपस्थित करून दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना ऑनलाईनद्वारे उपचारांचा सल्ला मिळतो. मात्र त्यांना औषधे मिळत नाहीत. त्यामुळे ग्रामिण आणि दुर्गम भागातील रूग्णांच्या उपचारासाठी औषधांचा मोफत पुरवठा करा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी लोकसभेत केली.
सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रामीण क्षेत्रात टेलिमेडिसिन सुविधा ह्या मुद्द्यावर बोलताना खा.श्रीनिवास पाटील यांनी ही मागणी केली.
यावेळी खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा रूग्णालयात जाऊन औषधे घेणे अवघड व अडचणीचे ठरते. तर अनेकदा जिल्हा रूग्णालयात वेळेवर औषधे उपलब्ध होत नाहीत. केंद्र सरकारने टेलिमेडिसिनद्वारे ऑनलाईन आजाराचे निदान झाल्यावर संबंधित रूग्णाला त्याच्या गावात मोफत औषधे उपलब्ध करून द्यावीत. यासाठी सरकारने काही योजना आखली आहे काय ? नसेल तर तशी योजना करावी अशी मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय म्हणाले, भारत सरकारच्या वतीने नॅशनल हेल्थ मिशन योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत मधून नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.
टेलिकन्सल्टेशनमुळे गरीब आणि दुर्गम भागातील रूग्णांना जिल्हा रूग्णालयात जाण्याची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे दररोजच्या टेलिकन्सल्टेशनला मोठा प्रतिसाद मिळत असून सामान्य नागरिकांच्या उपचाराकरिता ते फायदेशीर ठरू लागले आहे.