राज्याला पुन्हा सलग तीन दिवस अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता
'या' हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय अंदाज

चांगभलं ऑनलाइन | परभणी
खरीप हंगामाच्या काढण्या सर्वत्र सुरुवात होऊन काही भागात रब्बीच्या पेरण्यांनाही सुरुवात झाली आहे. शिवारात शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे तर शहरी भागात दिवाळीच्या खरेदीची धामधूम अजूनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २५ नोव्हेंबर पासून पुढचे तीन दिवस राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे.
डख यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, २४ नोव्हेंबर पासूनच राज्यात सर्वत्र वातावरण ढगाळ राहणार आहे. २५ नोव्हेंबर, २६ नोव्हेंबर व २७ नोव्हेंबर हे सलग तीन दिवस राज्यातील विदर्भ , मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्रात काही भागात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात वातावरण ढगाळ पण कोरडे राहणार आहे.
अवकाळी पाऊस हा मान्सून पावसासारखा एकसारखा आणि सर्वत्र पडत नाही. त्या त्या विभागातील, जिल्ह्यातील विशिष्ट भागापुरता हा पाऊस पडत असतो. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करत हा पाऊस पडणार आहे हे मात्र नक्की, असं सांगून डख यांनी पुढे म्हटलं की, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी ज्यांच्या बागा फुलाच्या स्थितीत आहेत, त्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घ्यावी. तसेच फळबागा उत्पादकांनीही आपापल्या परीने आपल्या पिकांची काळजी घ्यावी. आकाशात विजा चमकणार असल्याने शिवारात राबणाऱ्या शेतकऱ्यांनी विजांपासून स्वतःचे संरक्षण करावे, काळजी घ्यावी, असं आवाहनही डख यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.