
चांगभलं ऑनलाइन | वडीगोद्री
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही , याची लेखी हमी द्यावी आणि सगेसोयरेची अधिसूचना रद्द करावी, या मागणीसाठी वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणस्थळी आजच्या आठव्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन हाके व त्यांच्या सहकार्यांसोबत चर्चा केली . या भेटीदरम्यान दलित चळवळीतील नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं. तर वडेट्टीवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच फोन लावला. दरम्यान, उद्या उपोषणाच्या नवव्या दिवशी राज्य सरकारचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे चर्चेसाठी जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्नी. शिंदे यांनी दिली.
ओबीसी आरक्षण बचावाची भूमिका घेऊन वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे आमरण बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज ( गुरुवारी) उपोषणाचा आठवा दिवस आहे. आजही दोघांनी उपचार घेण्यास नकार देत उपोषण सुरू ठेवले. या उपोषणाची तीव्रता राज्यभरात वाढू लागली आहे. अनेक जिल्ह्यातून ओबीसी बांधवांचा हाके यांना पाठिंबा मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन हाके व त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसींचं ताट हे वेगळच असायला हवं . तशी भूमिका आम्ही पक्षाच्या पातळीवर यापूर्वीच घेतली आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या. ओबीसींचं आरक्षण ओबीसींनाच असायला हवं. समाजात चढ-उतार होत असतात. नवीन वर्ग निर्माण होत असतात. त्यामुळे त्यांना कशा सवलती देता येतील हे सरकारनं ठरवलं पाहिजे. ओबीसी आणि मराठा एकमेकांच्या विरोधात उभे राहत असल्याने समाजातील सलोखा बिघडत चालला आहे. सरकारने यासाठी वेळीच पावले उचलली पाहिजेत. सरकार, राजकीय पक्ष दोन्ही समाजाला विधानसभेपर्यंत झुलवत ठेवणार असेच चित्र सध्या दिसत आहे.
दरम्यान, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही आज ( गुरुवारी ) वडीगोद्री येथे जाऊन ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच फोन लावला . त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये राज्य शासनाचे शिष्टमंडळ उद्या वडीगोद्रीला जाऊन ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी आपण घेतली असल्याचेही’ मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
विजय वडेट्टीवर भावूक….
ओबीसींच्या उपोषणस्थळी विजय वडेट्टीवार भावुक झाले होते. ते म्हणाले, सत्ता येते आणि जाते. मी त्याचा कधीच विचार केलेला नाही. ओबीसींच्या पाठीमागे उभा राहणे ही माझी जबाबदारी आणि कर्तव्य ही आहे. मंत्री गिरीश महाजन यांनीच सगेसोयरे जीआर न्यायालयात टिकणार नाही असे सांगितले आहे. मग त्याची अंमलबजावणी कशाला करताय? आज राज्य सरकारच्या चुकीच्या भूमिकेमुळे दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून राज्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
अख्खं गावच बसलं उपोषणाला….
ओबीसी आरक्षण बचावाची मागणी घेऊन उपोषणास बसलेल्या लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील खिळत गावातील ग्रामस्थांनी आज गावातून फेरी काढली आणि उपोषण सुरू केले. यावेळी ओबीसी एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या.
मंत्री महाजन यांच्यावर जरांगे पाटील भडकले…
मंत्री गिरीश महाजन यांनी ‘मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. मात्र मनोज जरांगे यांचं समाधान होणार नसेल तर काय करावे. सगेसोयरेंचा अध्यादेश न्यायालयात टिकणार नाही’, असं मत व्यक्त केलं होतं. त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी आधी सांगायचं. मग त्यांचा प्यादा असलेल्या मित्राने सगेसोयरेचा अध्यादेश टिकणार नाही असं म्हणायचं. हे आम्हाला समजत नाही का? पूर्वी आरक्षण दिले आणि उडवले. आता सगेसोयरेचा अध्यादेश पण हेच उडवणार. मराठा आणि कुणबी एक नसल्याचे सिद्ध करून दाखवा. आरक्षण सरसकट द्या. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र हवे असतील ते घेतील. कुणावर सक्ती नाही. पण आपण जिवंत असेपर्यंत ओबीसीतूनच आरक्षण घेणार. 13 तारखेपर्यंत सरकारने काय ते करावे, अन्यथा त्यानंतर पुढची भूमिका ठरवू. वेळ पडली तर 288 ठिकाणी उमेदवार देऊ किंवा उमेदवार न देता 288 उमेदवार पाडू, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.