लोकसभेच्या निवडणूक आचारसंहितेचा तमाशा लोककलेला फटका – changbhalanews
कलारंजन

लोकसभेच्या निवडणूक आचारसंहितेचा तमाशा लोककलेला फटका

ऐन जत्रा-यात्रांच्या हंगामात राज्यभरात तमाशा फडांची आर्थिक परवड

चांगभलं ऑनलाइन |

सध्या सगळीकडेच लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. आचारसंहिता लागलेली आहे. त्यात गावोगावच्या यात्रा जत्रांचा मौसम आहे. यात्रा जत्रा निमित्ताने गावकरी व आलेल्या पै पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी खास आकर्षण ठरणाऱ्या तमाशा लोककलेला लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा फटका बसत आहे. गावचे कार्यक्रम रद्द झाले आहेत तर अनेक गावकऱ्यांनी आचारसंहितेमुळे कार्यक्रम लवकर उरकावा लागत असल्याने तमाशा कार्यक्रमाची ‘सुपारी’ कमी केली आहे. महाराष्ट्रभर सर्वत्र हे चित्र पाहायला मिळत आहे.

गुढीपाडवा ते अक्षय तृतीया हा महाराष्ट्रातील यात्रांचा मोठा हंगाम असतो. गावच्या यात्रा जत्रांमध्ये या काळात यात्रा कमिट्यांकडून करमणुकीसाठी लहान-मोठ्या तमाशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. सध्या मात्र लोकसभेच्या आदर्श आचारसंहितेमुळे ऐन यात्रा जत्रांच्या काळात तमाशा कार्यक्रमांना अडचणी येत असल्याने फड मालक आणि कलावंतांची आर्थिक परवड सुरू झाली असल्याचे गेल्या तीन दिवसापासून चांदेकसारे शिवारात कार्यक्रम नसल्याकारणाने मुक्कामी थांबलेल्या हरिभाऊ बढे नगरकर सह शिवकन्या बढे नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या संचालिका ढोलकी पट्टू शिवकन्या बढे नगरकर सांगितले.

गेल्या अनेक वर्षापासून तमाशा फड मालक अडचणीत आहेत. स्वाईन फ्ल्यू, नोटबंदी, लॉकडाऊन, अवकाळी पाऊस अशा संकटांशी सामना करत तमाशा फड मालक, तमाशा कलावंत उभे राहत असतानाच आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनेक कार्यक्रम रद्द झाले आहेत , होत आहेत. त्यामुळे तमाशा फडांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. हंगाम सुरू असल्याने कार्यक्रम नसला तरी तमाशा फड मालकांना दररोज 70-80 कलावंत सांभाळावेच लागतात. तमाशा कलावंतांना व बिगारी काम करणारे कर्मचाऱ्यांना दररोजचा भत्ता, चहा, नाश्ता, पाणी, जेवण तसेच पैशांची उचल द्यावीच लागते. शिवाय पाच-सहा गाड्यांचा डिझेलचा खर्च असतोच. कमाईची कुठलीही शाश्वती नसताना सावकारी कर्ज काढून उभा केलेला हा एवढा मोठा डौलारा घेऊन महाराष्ट्र भर कमाईच्या आशेने हा तमाशा कलावंत फिरतोच आहे.

होळी सणानंतर गावोगावच्या यात्रा जत्रा सुरू होतात आणि हाच तमाशा कलावंतांचा कमाईचा काळ असतो. परंतु नेमके याच वेळेस सध्या आचारसंहिता लागलेली असल्याने तमाशा कलावंतांचे आर्थिक भाराने कंबरडे मोडले आहे. स्थानिक पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, नगरपालिका आचारसंहितेचे कारण सांगून तमाशा कार्यक्रमाला परवानगी देत नाकारतात. आणि दिली तरीही खूप काही अटी नियम घालून परवानगी देतात. त्यामुळे ही डोकेदुखी नकोच, असा यात्रा कमिटी आणि गावऱ्यांचा सूर असतो. त्यामुळे यानिमित्ताने खरोखरच आदर्श आचारसंहितेचा अभ्यास होणे गरजेचे आहे. केवळ आचारसंहितेचे कारण सांगून गावोगावच्या यात्रा जत्रा आणि तमाशा लोककलेला याचा फटका बसायला नको. वर्षभर ग्रामस्थ यात्रा-जत्रा यांची व तमाशाची आतुरतेने वाट बघत असतात , त्यांच्या आनंदावर विरजण पडायला नको. निवडणूक आयोगाने , आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन गावच्या यात्रा-जत्रातील तमाशाच्या कार्यक्रमांच्या नियम-अटी शिथिल करून परवानग्या देणे गरजेचे आहे. अन्यथा महाराष्ट्रातील लाखो तमाशा फड मालक, कलावंत व यावर अवलंबून असलेल्या अन्य व्यावसायिकांची मोठीच आर्थिक परवड होणार आहे.

फासा पडेल तो डाव, राजा करील तो न्याय….

दसरा सणाच्या आसपास तमाशा फड महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतात. होळी पर्यंत तमाशाचे तिकीटावर कार्यक्रम चालतात परंतु आता तिकीट काढून येणारा प्रक्षेक राहिला नाही. होळी पासून बुध्द पौर्णिमा पर्यंत गावोगावचे यात्रा कमिटी व गावकरी बिदागी देऊन ओपन कार्यक्रम ठेवतात. परंतु आता आचारसंहितेमुळे कार्यक्रमावर परीणाम झाला आहे. नेहमीच अडचणीत असलेल्या तमाशाकडे शासनाचेही
दुर्लक्षच आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील लोककलावंतांच्या अनेक पथकांना अनुदान पॅकेज जाहीर झाले, त्यात खडी गंमत, संगीत बारी, दशावतार व शाहिरी कलापथके यांना अनुदान जाहीर झाले , परंतु यात तमाशा फडांना डावलण्यात आले. ‘फासा पडेल तो डाव आणि राजा करेल तो न्याय’ अशी राज्यातील तमाशा फडांची अवस्था आज झाली आहे. त्यामुळे शासनाने गांभीर्याने सहकार्य न केल्यास महाराष्ट्राची ही लोककला हळूहळू नामशेष होईल.
अरुण खरात
( तमाशा लोककला व लोककलावंत अभ्यासक)

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close