कराडच्या उड्डाणपूलाला वळणमार्ग नसल्याने कराडचा लोणावळा होण्याची भीती
खा. श्री. छ. उदयनराजेंच्या सहकार्याने कराड शहरासाठी सर्वपक्षीय लढा उभारणार - माजी आ. आनंदराव पाटील

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराडजवळ मलकापूर-कराड शहरातून पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. यात नांदलापूर ते कराड असा सुमारे साडे तीन किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याचे काम काही महीनेपासून सुरू झाले आहे. हा उड्डाणपूल नांदलापूर फाटा ते कराड शहरातील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांची स्वागत कमान ते कोयना नदीवरील नवीन पूल शहर हद्दीपर्यंत उतरणारा प्रस्तावित होता. मात्र पुलाच्या मूळ आराखडयात कोणाच्या तरी हस्तक्षेपाने बदल करण्यात आला असून, हा उड्डाणपूल थेट वारुंजी-गोटे गावच्या हद्दीपर्यंत वाढवण्यात आला आहे, असा आरोप माजी आ. आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, या उड्डाणपुलामुळे कराडचा लोणावळा होण्याची भीती निर्माण झाली असून खा. छ. उदयनराजे भोसले यांच्या सहकार्याने सर्वपक्षीय लढा उभारला जाणार आहे. कराडचे महत्व कमी करणार असाल तर महामार्गाचे काम होऊ देणार नाही, असा इशाराही माजी आ. आनंदराव पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी माजी आ. आनंदराव पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी सांगितले की, नॅशनल हायवे कराडमधून गेला तर दळण वळण सुधारेल व कराडची आपोआप प्रगती होईल, ही दूरदृष्टी स्वर. यशवंतराव चव्हाण यांनी ठेवली होती. आज त्यांचे स्वप्न भंग करण्याचा प्लान व कराड शहराला लोणावळासारखे रूप (डीटेंच) देणेचे काम फ्लायओवर ब्रिजच्या नवीन प्लानमुळे केले जाणार आहे, जे कराड शहराच्या व मलकापूरच्या दृष्टीने अन्यायकारक आहे.
सातारा शहरातील लोकांना अप्रोच रस्ता देऊन पुन्हा पुणे-मुंबईकडे रस्त्याचा उड्डाणपूल प्लान केला आहे. त्याच प्रमाणे कराड शहरामध्ये पूर्वीप्रमाणे दोन्ही कराड व मलकापूर शहरांचे अस्तित्व अबाधित ठेवले पाहिजे, अशी प्रामुख्याने आमची अग्रही मागणी आहे.
सन २०२०-२१ साली एनएचएआयचा कराड-मलकापूर फ्लायओवर ब्रिजचा डीपीआर प्लान हा वेगळा होता व आज काम वेगळ्या प्लानप्रमाणे चालू आहे. यामध्ये प्रामुख्याने पाहिले तर नांदलापूर फाटा ते कराड शहरातील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब कमानी पुढे कोयना नदीच्या अलीकडे उतरणारा डीपीआर प्लान मंजूर होता. परंतु हा प्लान आज रोजी नांदलापूर ते नदी पलीकडे वारुंजी-गोटे फाटा ओवरब्रिज असा केला गेला आहे.
कराड शहराच्या सर्वांगीण विकासकारिता पूर्वीच्या २०२१ प्लाननुसार कोणतेही नॅशनल हायवेचे वाहन हे कोयना नदीपूर्वी कराड शहरामध्ये उतरणार होते आणि याचा फायदा सर्व व्यापारी व नागरिकांना होणार होता. परंतु सदर प्लानमध्ये आज रोजी हा बदल कोणाच्या हस्तक्षेपामुळे होत आहे का? याचे कारण काय? आणि शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना आयुष्यभर वारुंजी फाटयावरून परत शहरामध्ये येण्याची शिक्षा का? असा प्रश्न आनंदराव पाटील व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
कराड शहराच्या व मलकापूर शहराच्या ठिकाणी होणाऱ्या नवीन उड्डाणपुलावरून कराड शहराचे ट्रफिक किंवा हायवेवरुन येणारे ट्रफिक हे वारुंजी फाटावरुन परत कराडमध्ये आणण्याचा घाट रचला गेला आहे. असे जर झाले तर बेंगलूरू, कोल्हापूरवरुन येणारा माणूस हा कराड शहरामध्ये कधीच उतरणार नाही आणि तसाच पुढे निघून जाणार आहे. यामुळे कराड शहराचे अस्तित्व हळूहळू संपणार असून सर्व व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नागरिक यांना याचा निश्चित तोटा होणार आहे. सातारा, सांगली पश्चिम महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण असणारे आपले कराड शहर नॅशनल हायवेपासून वंचित होणार, असे चित्र आजरोजी दिसत आहे व याचा विचार होणे गरजेचे आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, पक्षाच्या माध्यमातून कराड आणि मलकापूर शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. विकासाची धोरणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ आखत असते मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अधिकारीच करत असतात, महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कराड, मलकापूर वासियांच्या भावना लक्षात घेऊन कराडच्या उड्डाणपुलाच्या आराखड्यामध्ये योग्य तो बदल करावा, अन्यथा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या सोबत भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा धैर्यशील पाटील यांनी दिला.
कराडला झाली सर्वपक्षीय बैठक…
या संदर्भात खा. छ. श्री. उदयनराजे भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, डॉ. अतुलबाबा भोसले, राजेंद्रसिंह यादव यांनी कराडमध्ये नगरपालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी व नॅशनल हायवेचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. कराडचे अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून तसा प्लान करून ना. नितिन गडकरी यांच्याकडे पाठवावा, असे निर्देश दिले आहेत. तसेच कराड येथील भेटी प्रसंगी ना. देवेंद्र फडणवीस यांना ही यासंबंधीचे निवेदन माजी आ. आनंदराव पाटील यांनी तसेच खा. श्रीनिवास पाटील यांनाही याबाबत निवेदन दिण्यात आले आहे.
कराडला उतरण्यासाठी कमानीजवळच रस्ता द्या…
आपण नागरिकांनी याचा विरोध करून कराड शहरमध्ये हायवे ट्रफिक उतरण्याचे ठिकाण हे कोयना नदीअलिकडेच पाहिजे आणि ते म्हणजे झीरो लेवल स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्वागत कमानी पुढे व कोयना नदीच्या अलीकडेच शहर हद्दीत हवे. याबाबत सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी एकनाथ बागडी, नितीन काशिद, विजय वाटेगावकर, सुहास जगताप, दादा शिंगण, आर. टी. स्वामी, आनंदराव लादे, कराड मलकापूरचे नगरसेवक, तसेच विविध पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते