साताऱ्यात धरणं भरली, चिंता मिटली!
नदीपात्रात वाढणाऱ्या पाण्याचा धोका ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

सातारा, 21 जून 2025 | हैबत आडके
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे लघु व मध्यम धरणांमध्ये जलसाठा १०० टक्के क्षमतेने भरलेला असून, यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या सिंचनाची चिंता दूर झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी चांगला आधार मिळणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, कोयना धरणात ३३ टक्के पाणीसाठा असून सध्या २.४३ टीएमसी (२८,०८३ क्यूसेक्स) पाण्याची मोठी आवक होत आहे. धरण परिसरात कोयना, नवजा व महाबळेश्वर भागात सरासरी ७८ ते १०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
✅ धरणं भरली, शेतीला दिलासा…
🌾पिण्याचे आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध:
जिल्ह्यातील माण, खटाव, सातारा व कोरेगाव तालुक्यातील २० पेक्षा अधिक लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना होणार आहे. आतापर्यंत ज्या भागांत पाण्याची टंचाई भासत होती, तिथे आता पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होणार आहे.
⚠️ सतर्कतेचा इशारा कायम:
तथापि, सदर धरणं ही“द्वारविरहित” असून त्यात विसर्ग नियंत्रण यंत्रणा नसल्याने, धरणांमध्ये होणारा अतिरिक्त येवा अनियंत्रितपणे नदीपात्रात सोडला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रालगत न जाण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
कार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी संबंधित ग्रामपंचायती व नगरपरिषदांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
🗺️१००% भरलेले प्रमुख प्रकल्प:
माण तालुका: आंधळी, रानंद (मध्यम), पिंगळी, ढाकणी, गंगोती, लोधवडे आदी (लघु)
खटाव तालुका: नेर, येरळवाडी (मध्यम), मायणी, डांभेवाडी, दरूज आदी (लघु)
सातारा तालुका: कुमठे, ठोसेघर (लघु)
कोरेगाव तालुका: अरबवाडी, हिवरे (लघु)
💬 शेतकऱ्यांची प्रतिक्रिया:
“यंदा वेळेवर पाऊस झाला आणि धरणं भरली. आता खरिपासाठी पाणी कमी पडणार नाही, हा मोठा दिलासा आहे,” अशी भावना गावातील शेतकरी चंद्रकांत माने (खटाव तालुका) यांनी व्यक्त केली.
धरणं भरली म्हणून दिलासा जरूर मिळाला आहे, पण विसर्ग अनियंत्रित असल्याने काळजी घ्या, असं प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
🗾 निरा नदीची पाणी पातळी वाढणार…
दरम्यान , वीर धरण पाणलोट क्षेत्रात पावसामुळे आणि नीरा नदीवरील को.प. बंधाऱ्यांची दुरुस्ती सुरू असल्यामुळे, वीर धरणाच्या नीरा उजव्या कालव्यावरील विद्युतीय गृहाद्वारे नदीपात्रात होणारा २००० क्यूसेक्स विसर्ग सकाळी १० ऐवजी सायंकाळी ६ वाजता सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीची पातळी वाढण्याची शक्यता असून, फलटण तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, तसेच पंप, तत्सम साहित्य किंवा जनावरे असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवावीत. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेऊन विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. अशा सूचना प्रशासन व जलसिंचन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.