100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत सातारा जिल्हा माहिती कार्यालयाला तृतीय क्रमांक; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते वर्षा पाटोळे यांचा सन्मान

सातारा, दि. १५ | चांगभलं वृत्तसेवा
राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांना राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा सन्मान जिल्हाधिकारी कार्यालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर संपन्न झाला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी राहूल पवार, वैभव जाधव, रुपाली तारळकर, अनिल नलवडे, सचिन राऊत, अनिता काशिद उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पातळीवरील 12,500 शासकीय कार्यालयांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी या गटातून राज्यस्तरावर सातारा जिल्हा माहिती कार्यालय तृतीय क्रमांकाने निवडले गेले.
जिल्हा माहिती कार्यालय हे शासनाच्या विविध योजना, उपक्रम, निर्णयांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसार देत शासन व प्रसारमाध्यमांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्यरत आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक हेमराज बागूल, किशोर गांगुर्डे, गणेश मुळे आणि पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयाने मोहिमेत अभिलेख निंदणीकरण व वर्गीकरण, जूने संगणक व निरुपयोगी साहित्यांचे निर्लेखन, कार्यालयाचे सौंदर्यीकरण, अभ्यागतांसाठी बैठकव्यवस्था, पिण्याचे पाणी व वाचनासाठी मासिके-पुस्तकांची उपलब्धता यांसारख्या सुधारणा केल्या.
तसेच, राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत 2 ते 4 मे 2025 दरम्यान महाबळेश्वर येथे होणाऱ्या महापर्यटन महोत्सवात सातारा जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.