
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील पाटण, कराड, खटाव, माण या तालुक्यातून जाणारा मल्हारपेठ पंढरपूर राज्य मार्गासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने ४८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी सांगितले. दरम्यान, मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने या रस्त्याच्या सर्व समस्या सुटणार आहेत आणि चार तालुक्यातील प्रवाशांना गतिमान प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
मल्हारपेठ ते मायणी पंढरपूर हा राज्यमार्ग क्रमांक १४३ दुरुस्तीची आवश्यकता होती. मागील अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू होते.आज अखेर महायुती सरकारने या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने या रस्त्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघाली आहे.
या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आ. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे आणि रामकृष्ण वेताळ यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र वायकर यांच्याकडे मागणी केली होती. सातत्याने शासन स्तरावर या मागणीचा पाठपुरावाही केला आहे. या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याने या रस्त्याची दुरावस्था कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. हा रस्ता सातारा लोकसभा मतदारसंघातील चार तालुक्यातून जातो. तसेच तीन विधानसभा मतदारसंघातून जात आहे. पाटण, कराड, खटाव माण या चार तालुक्यातील नागरिकांना या रस्त्यामुळे सुविधा प्राप्त होणार आहेत.महायुती सरकारने हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कराड तालुका भाजपा व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्यावतीने शासनाचे आभार मानण्यात येत आहेत.
निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान याचा अनुभव…
महायुती सरकार हे गतिमान निर्णयासाठी प्रसिद्ध आहे. या रस्त्याच्या कामासाठी आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ४८० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या कामासाठी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम नेते मनोज घोरपडे यांचेही सहकार्य लाभले.
– रामकृष्ण वेताळ
प्रदेश सचिव, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा.