
चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. तो शेतात राबतो, त्याचा घाम गाळतो, त्यावेळी धान्य पिकतं. तो एका दाण्याचे हजार दाणे करतो, बांधावरच्या शाळेचा शिक्षक तोच. तोच कष्टकरी, उत्पादक, अर्थतज्ज्ञ, आणि संशोधकही तोच. म्हटलं तर जगातला प्रत्येक जीव त्याच्याच उपकारात.
पण हा शेतकरी, त्याच्या शेती धर्माला जागला तर खरा ना ? पण तसं कुठं घडतंय? आपआपसातील मतभेदात तो एक-एका सरी अन् कुरीसाठी भांडायला उठतो. एकमेकांच्या शेताचे बांध पोखरून काढतो, तो एवढ्यावर थांबल तर नवल ना. पण तसं कुठं आलंय, अहो तो चक्क शेतातील उभ्या पिकाचा बळीही घेतोय ! खरं वाटत नाही ना? पण हे अगदी खरंय…हा प्रकार घडलाय कराडजवळच्या काले गावच्या शिवारात…!
काले गाव शेतकऱ्याचं गाव. पण दोन दिवसांपूर्वी मन सुन्न करणारी घटना या शिवारात घडली. अज्ञात शेतकरीच आपल्या एक बांधवाच्या जीवावर उठला. अन् रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत उभ्या आडसाली ऊस आणि त्यातील भुईमूगाच्या पिकावर पीक जाळणारं औषध मारून मोकळा झाला. पण या घटनेत भिकू शिवाजी देसाई या शेतकऱ्यानं तळहाताच्या फोडासारखी जपलेली दोन्ही पिके जळून गेली. २० गुंठे क्षेत्रावर हे नुकसान झालं. भिकू देसाईच नव्हेत तर त्यांचं अख्खं कुटुंब पिकाकडं पाहून ढसाढसा रडलं. हे नुकसान अनेकांना छोटं वाटेल. पण एकराची शेती गुंठ्या-गुंठयावर आलेल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी ते मोठंचं असतं. तसंच कालेतल्या देसाई कुटूंबासाठी हे मोठं नुकसान आहे.
असं घातक तणनाशक फवारणारा हा शेतकरीच असणार, अन्यथा त्याच्याकडं फवारणीचा पंप, विशिष्ट औषध कुठून येणार. औषधाच प्रमाणं ही त्याला नक्कीच माहिती असणारं. याबाबत देसाई यांनी नांदगावच्या पोलीस चौकीत तक्रार दाखल केलीय. त्यामुळं आता पोलीस त्या समाजकंटकाला शोधून काढतील का? आणि भिकू देसाईंना नुकसान भरपाई मिळेल का ? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही भिकू देसाई यांना पिकांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी भागातील शेतकऱ्यांनी केलीय.
सदर बातमीचा व्हिडिओ आपण आमच्या @changbhalanews या YouTube channel वर पाहू शकता.