सराईत सोम्या सुर्यवंशीच्या टोळीला मोक्का

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कारवाईच्या प्रस्तावाला छाननी पश्चात मान्यता दिल्यानंतर सोमवारी रेकाॅर्डवरील सराईत सोम्या उर्फ सोमनाथ अधिकराव सूर्यवंशी (वय ३१), रविराज शिवाजी पळसे (वय २७), आर्यन चंद्रकांत सूर्यवंशी (वय १९, तिघेही रा. हजारमाची-ओगलेवाडी, ता कराड ) या तीन संशयितांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात कलमवाढ करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. दरम्यान या मोक्का कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोम्या उर्फ सोमनाथ हा हजारमाची येथील ग्रामपंचायत सदस्य आहे. त्याच्यासह त्याच्या इतर साथीदारांनी १३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खंडणीसाठी एकावर प्राणघातक हल्ला केला होता. संशयितांनी कोयता तसेच बियरची बाटली फोडून एकावर वार केले होते. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याच्या तपासात टोळीप्रमुख सोम्या उर्फ सोमनाथ सुर्यवंशी हा त्याच्यासह साथीदारांसोबत परिसरात दहशत करून आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हेगारी करत असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आंचल दलाल, उपअधिक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, उपनिरीक्षक राजू डांगे, पतंग पाटील, सहा . फौजदार संजय देवकुळे, अमित सपकाळ, असिफ जमादार, सागर बर्गे, प्रवीण पवार, कुलदीप कोळी, अमोल देशमुख, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांच्यासह पथकाने संबंधित टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे सोम्या सुर्यवंशी याच्या टोळीला मोक्का लावण्यात आला असून पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर तपास करत आहेत.
दहशत माजवणाऱ्यांवर मोक्का आणि तडीपारी…
कराड शहर परिसरात यापूर्वी गुन्हेगारी टोळ्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झालेली आहे. गत काही महिन्यात काही टोळ्या पुन्हा सक्रिय होऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर तडीपारीची व मोक्का कारवाई केली आहे. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे, असा इशारा पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिला आहे.