मध्यम व लहान धरणे भरली, पण कोयना व मोठी धरणे अद्याप अपुरीच – साताऱ्याला अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा

सातारा, 22 जून 2025 | हैबत आडके
पावसाळा सुरू झाला असला तरी सातारा जिल्ह्यातील बहुतांश मोठ्या धरणांमध्ये पाणीसाठा ५० टक्क्यांच्या खालीच आहे. दुसरीकडे, काही मध्यम व लहान धरणे शंभर टक्के भरल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही जिल्ह्यातील कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी यांसारख्या महत्त्वाच्या धरणांना पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पावसाची अजूनही प्रतिक्षा आहे.
जिल्ह्याची मुख्य जीवनवाहिनी असलेल्या कोयना धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत ३६.५६० टीएमसी पाणीसाठा असून तो केवळ ३४.७४ टक्के इतकाच आहे.
पाण्याची आवक २०,९११ क्युसेक्स इतकी नोंदवली गेली असून, १०५० क्युसेक्स विसर्ग (KDPH) सुरू आहे.
कोयना परिसरात कालच्या दिवशी ५७ मिमी पाऊस, नवजामध्ये ३४ मिमी, तर महाबळेश्वरमध्ये ५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
🟣जिल्ह्यातील इतर मोठ्या प्रकल्पांमध्ये ३५ ते ५५ टक्क्यापर्यंतच पाणीसाठा…
धोम धरण : ७.०१० टीएमसी (५१.५३%), आवक २०३५ क्युसेक्स, विसर्ग नाही.
धोम-बलकवडी : ०.६७० टीएमसी (१६.४२%), आवक ५६० क्युसेक्स, विसर्ग शून्य.
कण्हेर : ५.६२० टीएमसी (५५.६४%), आवक ५९३ क्युसेक्स, विसर्ग ५४० क्युसेक्स सध्या सुरू असून दुपारी ३.३० वाजल्यानंतर १००० क्युसेक्स विसर्ग नदीपत्रात सोडला जाणार असल्याने वेण्णा नदीची पाणी पातळी वाढणार आहे.
उरमोडी : ५.४४० टीएमसी (५४.६२%), आवक २७१२ क्युसेक्स, विसर्ग नाही.
तारळी : २.०७० टीएमसी (३५.३८%), आवक १६९५ क्युसेक्स, विसर्ग नाही.
🔵दुसरीकडे, मध्यम व लहान प्रकल्पांच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढ…
जिल्ह्यातील येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी या प्रकल्पांत १०० टक्के साठा असून, येरळवाडीत ११७७ क्युसेक्सची आवक आणि ११७७ क्युसेक्स विसर्ग नोंदवला आहे.
मोरणा : ०.९३७ टीएमसी (६७.४१%), आवक ८२९ क्युसेक्स, विसर्ग ९९० क्युसेक्स.
उत्तरमांड : ०.६१० टीएमसी (६९.३२%), आवक व विसर्ग ६०५ क्युसेक्स.
हातेघर : ०.१२१ टीएमसी (४६.५४%), आवक ३३२ क्युसेक्स, विसर्ग २९ क्युसेक्स.
वांग-मराठवाडी : १.४३४ टीएमसी (५२.५३%), आवक ३५९ क्युसेक्स, विसर्ग १०० क्युसेक्स.
महू धरण : ०.३९५ टीएमसी (३५.९१%) पाणीसाठा असून, ३०६ क्युसेक्सची आवक आहे, मात्र सध्या विसर्ग सुरू नाही.
अशा स्थितीत मध्यम व लहान प्रकल्प सध्या समाधानकारक भरलेले असले, तरीही कोयना व अन्य मोठ्या प्रकल्पांमधील साठा फक्त ३५ ते ५५ टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही दीर्घकाळ पावसाची आवश्यकता आहे.
⚠️पुरंदर तालुक्यातील वीर धरणांची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी १२ नंतर ६७३७ क्युसेक्स विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून फलटण तालुक्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन नीरा उजवा कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आले आहे.
🏞️पर्यटनस्थळी गर्दी वाढतेय; सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाचे कठोर धोरण…
पावसाळा सुरू झाल्यानंतर साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली, पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन स्थळ, व धरणे अशा पर्यटन स्थळांच्या परीसरात राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी २० जून ते १९ ऑगस्ट दरम्यान जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय नागरी संरक्षण संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आचारसंहिता लागू केली आहे.
पर्यटकांना धबधब्याखाली जाणे, प्रवाहात उतरणे, मद्यपान करणे, उघड्यावर कचरा फेकणे, असभ्य वर्तन, मोठ्या आवाजात संगीत वाजवणे यांसारख्या कृतींवर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध घातला आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पर्यटकांनी आनंद घेत असतानाही आपली सुरक्षितता आणि कायद्याचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
🪧वनविभागाकडून पर्यटकांसाठी सूचनाफलक…
कोयनाघाट परिसरातील ओझर्डे, पाभळनाळा, गाढवराई, घाटमाथा या धबधब्यांवर पर्यटन करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे सूचना फलक वनविभाग, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने लावण्यात आले आहेत.
🚧पाटण-कोयना महामार्ग जड वाहनांसाठी बंद…
पावसामुळे पाटण ते कोयना मार्गावरील वाजेगावजवळ रस्ता वाहून गेल्याने जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
हलक्या वाहनांना मात्र मार्ग खुला ठेवण्यात आला आहे.
वाहनधारकांनी कराड – मलकापूर – आंबा घाट – संगमेश्वर – चिपळूण या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित मार्गावर दिशादर्शक फलक व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
⚡महावितरणची तत्पर सेवा : पावसात वीजखांब दुरुस्त…
केळेवाडी, जगदाळेवाडी, कडवे खुर्द या भागांमध्ये पावसामुळे वीज खांब वाकले होते. महावितरणच्या पथकाने तातडीने दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत केला आहे.
📢 जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन :
“पर्यटनाचा आनंद घ्या, पण तो तुमच्यावर किंवा इतरांवर बेतू नये. प्रशासनाने घालून दिलेली नियमावली ही तुमच्याच सुरक्षिततेसाठी आहे, याची जाणीव ठेवा.”