
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक चळवळीसाठी राष्ट्रीय अकादमी अंतर्गत चेतक कार्यकर्ता प्रशिक्षण व सामाजिक सलोखा परिषद मोठ्या उत्साहात आणि ऐतिहासिक ठराव संमत करून संपन्न झाली.
इंडीयन युथ फौंडेशन, मी नागरिक फाऊंडेशन, कराड, ब्लड डोनर , समतापर्व, संविधान प्रचारक व अग्रणी सोशल फौंडेशन या संस्थांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील सामाजिक चळवळीत कार्यरत निवडक सक्रिय चेतक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रशिक्षणामध्ये पाटण, सातारा, कराड, खटाव, कुपवाड, इस्लामपूर, पुणे, तासगाव, विटा, वाई, कडेगांव येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कॉ.धनाजी गुरव म्हणाले, देशात थैमान घालत असलेल्या मनुवादी प्रवृत्तीला सर्व बहुजन लोकांनी एकत्र येऊन रोखले पाहिजे, नाहीतर भविष्यात खूप मोठे धोके निर्माण होऊ शकतात. इंजि. फारुक गवंडी यांनी अल्पसंख्यांक समाजाचे राक्षणीकरण मोठ्या प्रमाणात चित्रपट, सोशल मिडिया, काल्पनिक गोष्टी रचून केले जात आहेत. त्यातून धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे सांगितले. अॅड. अमीर मणेर यांनी सातारा जिल्ह्यातील खोट्या तक्रारी व मिडिया ट्रायल विषयी माहिती दिली. पैगंबर शेख यांनी मुस्लिम समाजातील कालबाह्य प्रकार व धार्मिक सुधारणा यावर अधिक भाष्य केले. सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी मुस्लिमांनी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन केले.
तर मिनाज सय्यद यांनी सामाजिक सौहार्द, सामंजस्य व बंधुता वाढली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. सातारा जिल्ह्यात अशा प्रकारे वैचारिक मंथन व चर्चा घडवणारा प्रथमच हा उपक्रम राबविला गेला. या प्रकारची सामाजिक चळवळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत, शहरात पोहोचवण्यासाठी संयोजकांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक आझाद कालेकर, आभार व कृतीकार्यक्रम वाचन अय्याज शिकलगार, संविधान प्रास्ताविका व राष्ट्रगीत गायन दिपालीताई तर पाहुण्यांची ओळख मी नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष विद्याधर गायकवाड, अब्बास शिकलगार, इर्शाद खैरतखान, आयुब मुल्ला, शहानवाज पन्हाळकर यांनी करून दिली. यावेळी मुबारक शेख, अझर पटेल, अमर तांबोळी, जस्मीन शेख उपस्थित होते.