कराड दक्षिणचे जनता कामाच्या माणसालाच निवडून आणते – आ. रामहरी रुपनवर
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ कार्वे येथे सभा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
१९८०च्या दशकात अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी संगणकाचा शोध लावला. त्यांनी संगणकामध्ये इंग्रजीशिवाय दुसरी भाषा येवू शकत नाही, असा दावा केला होता. मात्र आ. पृथ्वीराजबाबांनी संगणकामध्ये देव नागरी भाषा आणून मोठी क्रांती केली. त्यामुळे पृथ्वीराजबाबा कोण आहेत हे जगाला कळले. असा बुद्धिमान प्रतिनिधी कराड दक्षिणचा लोकप्रतिनिधी आहे. हे भाग्य कराड दक्षिण मधील जनतेने जपावे. कराड दक्षिण मधील जनता कामाच्या माणसालाच निवडून आणते, असे प्रतिपादन माजी आ. रामहरी रूपनवर यांनी केले.
कार्वे (ता. कराड) येथील काँग्रेस महाविकास आघाडीच्या झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भास्करराव थोरात अध्यक्षस्थानी होते. आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, अजितराव पाटील – चिखलीकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मनोहर शिंदे, फारुख पटवेकर, प्रकाश पाटील, संभाजी काकडे, संभाजी चव्हाण, नितीन ढापरे, प्रा. धनाजी काटकर, रंगराव थोरात, जयवंतराव थोरात, वैभव थोरात, अधिकराव जगताप, डॉ. सुधीर जगताप, रोहित पाटील, जे. डी. मोरे, शिवाजीराव जाधव, संतोष जाधव, अक्षय सुर्वे, मराठा महासंघाचे नेते जनार्दन देसाई, प्रकाश पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे विश्वासराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. रूपनवर म्हणाले, सरकारच्या तिजोरीतून खाली पडलेला ढिगारा कराड दक्षिणमध्ये संपायचा नाही, त्यामुळे विकास निधीची काळजी करू नका. २८८ आमदारांमध्ये पृथ्वीराजबाबा सभ्य आणि सुसंस्कृत नेते आहेत. मंत्रालयातील सचिवांना बाबाच मुख्यमंत्री हवे आहेत. अशा माणसावर फुले टाकायला पाहिजेत. पण त्यांच्यावर असभ्य बोलता, हे चुकीचे आहे.
निम्मी राज्यघटना भाजपच्या नेत्यांनी बदलली आहे. पंतप्रधान आणि दोन मंत्री हेच निवडणूक आयोग नेमतात. त्याही पुढे जाऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणूकाच होत नाहीत, त्यामुळे या बाबी समजून घ्या. भाजपवाल्यांनी जनतेच्या मालकीच्या कंपन्या विकल्या असून त्यांना देशात हुकुमशाही आणायची आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभेला राज्यातील जनतेने भाजपच्या प्रगती पुस्तकावर नापास शेरा मारला आहे. आताही राज्यात तेच होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे.
अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, देशाचा खरा विकास काँग्रेसने केला. शिक्षण, कृषी, औद्योगिक विकासाचा पाया काँग्रेसने घातला. त्यामध्ये पृथ्वीराजबाबांचाही महत्वाचा वाटा आहे. हे ओळखून या निवडणुकीत आ. पृथ्वीराज बाबांना निवडून दिले पाहिजे . मतदार संघात कोणी उमेदवार अथवा त्यांचे समर्थक अमिष दाखवतील, त्याला बळी पडू नका. मानसिकता सरंजामशाहीची असणाऱ्या मंडळींकडून आपणाला ‘लाभार्थी’ अशी भाषा वापरली जात आहे.
अजितराव पाटील म्हणाले, वारंवार पक्ष बदलणाऱ्या अतुल भोसले यांना कदापि थारा देवू नका.
फारुख पटवेकर, जनार्दन देसाई, अॅ ड. विकास जाधव, डॉ. सुधीर जगताप, रामभाऊ दाभाडे यांची भाषणे झाली. अशोकराव थोरात यांनी प्रास्ताविक केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.
खरे सत्य सांगितले तर उघडे व्हाल… बंडानाना जगताप
जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप म्हणाले, मला त्यांचा लाभार्थी म्हणणाऱ्या लोकांनी माझ्या मुलाचा पाय काढण्यापर्यंत उपचार नेले. त्यामुळे अतुल भोसले यांनी मला लाभार्थी म्हणू नये, खरे सत्य सांगितले तर ते उघडे होतील. तुमचा इतिहास असा आहे की तुमच्या पणजोबाने गावची सोसायटी जाळली. ही मंडळी कारखान्याच्या सभासदांना ऊसाचा प्रतिटन ४९७ रुपये दर कमी देवून विधानसभेचा खेळ खेळत आहेत, अशी टीका बंडानाना जगताप यांनी केली.