राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त ब्रह्मदास विद्यालयात प्रेरणादायी कार्यक्रम

कराड, दि. २६ | चांगभलं वृत्तसेवा
सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या मूल्यांची पायाभरणी करणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ब्रह्मदास विद्यालयात प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. बी. माने यांनी स्वागत व प्रास्ताविक करत शाहू महाराजांच्या कार्याचा इतिहास मांडला. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने शिक्षणाचे दाते होते. सर्व समाजासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडून त्यांनी परिवर्तनाची वाट मोकळी केली.”
विद्यार्थ्यांपैकी १५ जणांनी आपल्या मनोगतातून शाहू महाराजांचा जीवनप्रवास, समाजातील योगदान आणि लोकशाही मूल्यांवरील त्यांचा ठसा यावर विचार मांडले. “आज आपण शिक्षण घेत आहोत, त्यामागे शाहू महाराजांचे योगदान आहे. ते केवळ राजे नव्हते, तर खरे लोकनेते होते,” असे विद्यार्थ्यांनी नमूद केले.
ICT शिक्षिका पल्लवी मोहिते यांनी शाहू महाराजांचा दृष्टीकोन स्पष्ट करत सांगितले की, “विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञानात मर्यादित न राहता शाहू महाराजांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे.”
सहा शिक्षक बी. डी. पोरे यांनी आपल्या भाषणात शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांचा ऊहापोह करत सांगितले की, “दुर्बल घटकांना त्यांनी दिलेले बळ आज शिक्षणव्यवस्थेत झळकते.”
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवानराव मोहिते यांनी उपस्थित पाहुण्यांना उद्देशून सांगितले की, “शाहू महाराज हे एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर एक व्यापक विचारधारा होती. त्यांनी दिलेले मूल्य आजही महाराष्ट्राला योग्य मार्ग दाखवतात.”
कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष बी. डी. पोरे व उपकार्याध्यक्ष वहिदा आतार यांनी संपूर्ण संयोजन अत्यंत उत्तमरीत्या पार पाडले. बी. ए. भोसले यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले, तर जी. व्ही. रणदिवे यांनी आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आनंदराव मोहिते, अंकुश मोहिते, दत्तात्रय मोहिते, प्रसिद्धी विभाग प्रमुख पी. टी. पाटील, तसेच सहा शिक्षक एस. डी. वाबळे, पी. के. बांबरे आणि कामडी सर उपस्थित होते.