
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनांतर्गत नागरी बँकांचा समावेश करावा, अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना व व्याज परतावा योजना या विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सुरू आहेत. महामंडळाकडून विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांसाठी व नवीन उद्योजकांसाठी राष्ट्रीयकृत बँकेकडूनच कर्ज घेणे आवश्यक करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले तरच या व्याज परतावा योजनेचा फायदा नागरिकांना दिला जातो, परंतु राष्ट्रीय बँकांकडून बेरोजगार युवकांची कर्ज प्रकरणे मंजूर केली जात नाहीत, त्यामुळे सर्व सामान्य नागरिक व नवउद्योजक या योजनांच्या लाभापासून वंचित राहतो. या योजनांचा नवउद्योजकांना लाभ मिळण्यासाठी यामध्ये नागरी सहकारी बँकांचा समावेश करावा, अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे व अमोल गावडे यांनी केली आहे.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळास प्रतिवर्षी भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. परंतु भटक्या व विमुक्त जमातींना त्याचा लाभ मिळत नसल्याने तो निधी प्रतिवर्षी परत जातो. धनगर समाज व इतर भटक्या, विमुक्त जमातींसाठी महामंडळ निर्माण केली गेली. परंतु खऱ्या अर्थाने जेवढी आश्वासने दिली आहे, तेवढी प्रकरणे मंजूर करण्यात येत नाहीत. त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे बेरोजगार युवकांचे प्रमाण वाढत आहे. नोकरीचे सुद्धा प्रश्न खूप गंभीर बनला आहे. राष्ट्रीय बँकांमध्ये अडवणूक केली जात आहे. त्यामुळे या महामंडळांच्या कर्ज योजनांची अंमलबजावणी नागरी सहकारी बँकांचा समावेश करून करावी व नवउद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.