
मुंबई | चांगभलं वृत्तसेवा
देशी गायींच्या संवर्धनासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत, राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून घोषित केला आहे. राज्य शासनाने याबाबतचा अधिकृत अध्यादेश निर्गमित केला असून, गोसेवा क्षेत्रात याचे स्वागत होत आहे.
या निर्णयामागे देशी गायींच्या वंशसंवर्धनाची तातडीची गरज अधोरेखित झाली आहे. मराठवाड्याच्या देवणी, पश्चिम महाराष्ट्रातील खिल्लार, उत्तर महाराष्ट्रातील डांगी आणि विदर्भातील गवळाऊसारख्या स्थानिक गायींच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. कमी दूध उत्पादन व प्रजननक्षमतेच्या कारणांमुळे ही परंपरागत गोवंश जपण्यास अनेक अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकार आता आधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशी गायींच्या गुणवत्तेत वाढ करून त्या उत्पादनक्षम करण्यावर भर देणार आहे. यासोबतच देशी गायींच्या दूध, शेण व गोमुत्रावर आधारित उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे नियोजनही आखले जात आहे.
२२ जुलै रोजी संपूर्ण राज्यात या दिवसाचे औचित्य साधून शिबिरे, चर्चासत्रे, प्रदर्शने व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याचे आयोजन पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि संबंधित विभागांच्या संयुक्त विद्यमाने होणार असून, खर्च गोसेवा आयोगाच्या निधीतून केला जाणार आहे.
या निर्णयामुळे देशी गोवंश वाचवण्याच्या लढाईला नवे बळ मिळणार आहे. “राज्याच्या संस्कृतीत गायीला ‘राज्यमाता’चा दर्जा देणाऱ्या महाराष्ट्राने आता तिच्या संवर्धनासाठीही ठोस पावले टाकली आहेत,” असे गौरवोद्गार पंकजा मुंडे यांनी यावेळी काढले.