डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उपक्रमासाठी तोरणे दांपत्याचा गौरव | समाजभान जागवणाऱ्या कार्याची दखल

आटपाडी | चांगभलं वृत्तसेवा
ज्येष्ठ पौर्णिमेच्या पावन प्रसंगी घरनिकी (मुंबई) येथील बौद्ध समाज ग्रामस्थांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात, होलार समाजाचे अध्यक्ष आणि सांगली जिल्हा कलाकार संघटनेचे अध्यक्ष सुनीलभाऊ तोरणे व महिला आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या उपाध्यक्षा सौ. अश्विनी तोरणे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे घरनिकी गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्थापनेसाठी सुरू झालेल्या उपक्रमाला मिळालेला ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद. या उपक्रमामागे तोरणे दांपत्याचे नेतृत्व, त्यांची बांधिलकी आणि सततची चळवळ यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
या कार्यक्रमाला शिवाजी खैरमोडे (माजी उपसरपंच), सौ. मिलन अशोक कदम (व्हा. चेअरमन, सेवा सोसायटी), भीमराव कदम, नरेंद्र कदम, नंदा खैरमोडे, दादा कदम, संध्याराणी कदम यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
भीमरावतात्या कदम यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “सुनीलभाऊ व अश्विनीताईंनी बाबासाहेबांच्या कार्यासाठी गावात गेली अनेक वर्षे जनजागृती केली. घरनिकीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती याअगोदर कधीच अनुभवली गेली नव्हती.”
कार्यक्रमातून सामाजिक सलोखा अधिक दृढ झाला असून आंबेडकरी विचारधारा गावात रुजताना दिसते आहे. पुतळा स्थापनेचा उपक्रम हा केवळ स्मरणार्थ नसून परिवर्तनाची नांदी ठरत आहे.
“हा सत्कार माझा नसून संपूर्ण चळवळीचा आहे. बाबासाहेबांचा पुतळा ही एक प्रतिमा नाही, तर विचारांचं अधिष्ठान आहे. गावकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद आमच्या कार्याला नवी उभारी देतो. मी सर्व सहकारी व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानतो.”
– सुनीलभाऊ तोरणे