
चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
देशात नुकत्याच पार पडलेल्या 18 व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 मतदार संघासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत इंडिया आघाडी (महाविकास) आघाडीला एका अपक्ष समर्थकासह 31 तर महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला. अनेक रथी-महारथी महाराष्ट्रात उमेदवार म्हणून या निवडणुकीत उतरले होते. त्यामध्ये काहींचा विजय झाला तर अनेकांना पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणूक म्हटले की कोणीतरी एक विजयी होणार आणि इतर सर्वजण पराभूत होणार हे ठरलेले असते. मात्र कष्टकऱ्यांसाठी , घाम गाळणाऱ्या, राबणाऱ्या हातांसाठी, शेतकरी-कामगारांच्या छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आवाज उठवणाऱ्या चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांचा झालेला पराभव अनेकांच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळेच पराभवानंतर त्यांनी सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टला हजारो लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. चळवळीतील पराभूत झालेल्या नेत्यांना दिलासा देणे हा नेटिझन्सचा मुख्य उद्देश असला तरी अनेकांना या कमेंट्स विचार करायला भाग पाडत आहेत.
कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या चळवळीतून पुढे आलेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी , माथाडी कामगारांच्या चळवळीतील नेते शशिकांत शिंदे असोत की वंचित, उपेक्षितांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर असोत. राजू शेट्टी यांनी साखरपट्ट्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी आयुष्य खर्ची घातले. आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. रक्तबंबाळ झाले, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. त्या माध्यमातून यापूर्वी ते खासदारही झाले होते. मात्र गत लोकसभेला त्यांचा पराभव झाला, याही लोकसभा निवडणुकीला त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
त्यांच्याप्रमाणेच सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवय्ये माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांनी यंदा प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांचा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी 32 हजार 771 मतांनी पराभव केला. शिंदे यांनी नवी मुंबई, मुंबई, वाशी मार्केट भागात पोटापाण्यासाठी हमाली करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील डोंगरदऱ्यांच्या दुर्गम भागातून जाणाऱ्या युवकांना माथाडी म्हणून दर्जा मिळवून दिला, त्यासाठी आंदोलने केली , मोर्चे काढले. माथाडींची आर्थिक परिस्थिती उंचावली जावी आणि त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यात यावी , यासाठी शिंदे यांनी मोठे कष्ट घेतले आहे. माथाडींचा लढवय्या नेता अशी त्यांची ओळख आहे.
तर वंचित, उपेक्षित समाजाचे विविध प्रश्न, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी दलित चळवळीतील अग्रणी नेते , श्रद्धेय बाळासाहेब तथा ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे आजवर मोठे योगदान राहिले आहे. जात आणि धर्म या पलीकडे जाऊन समाजातील छोट्या छोट्या घटकांना एकत्र करून त्यांच्यात राजकीय महत्त्वकांक्षा निर्माण करून त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवण्याचे स्वप्न घेऊन त्यांनी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. गेल्या काही वर्षात वंचित आघाडी महाराष्ट्रातील वंचितांचा हुंकार बनली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले. त्यांच्या वंचित आघाडीनेही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जागा लढवल्या मात्र कुठेही त्यांच्या उमेदवाराला खाते खोलता आले नाही. काही कारणांनी त्यांची अन्य कोणत्याही पक्षासोबत आघाडी किंवा युती होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत निवडणूक लढवली. अकोलामधून ते स्वतःही लढले, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
या चळवळीतील तिन्ही नेत्यांनी पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारला. कार्यकर्त्यांना धीर दिला. समजूत काढल्या. पराभवाच्यानंतर कार्यकर्त्यांना, मतदारांना, जनतेला उद्देशून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. चळवळीतील या नेत्यांचा पराभव केवळ त्यांच्याच मतदार संघातील नव्हे तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातीलही अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांनी लिहिलेल्या पोस्टवर, हजारोच्या संख्येने लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडत आहे. त्या पुष्कळ शेअर होत आहेत.
काय आहे शशिकांत शिंदेंची पोस्ट….
“विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही
पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही !
कवीवर्य सुरेश भट यांच्या कवितेतील या ओळीने माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे. “सातारा लोकसभा निवडणुकीत झालेला निसटता पराभव मी खिलाडूवृत्तीने स्वीकारतो. शरदचंद्रजी पवार साहेबांचा शिलेदार म्हणून ही निवडणूक लढायला मी तयार झालो. झालेल्या पराभवाचे नक्कीच आत्मपरीक्षण करू. अनेक वेळा जय-पराजयाचे प्रसंग येत असतात. सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेचे मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. गेले अनेक दिवस महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जीवाचे रान करत प्रचार करत होते. यापुढील काळात देखील माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आणि समस्त सातारच्या जनतेच्या मी ऋणात राहील !” अशी भावनिक साद घालत त्यांनी कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. त्यावर “पराभवाने खचले, ते शशिकांत शिंदे कसले!” , “वाईट काळाचे साक्षीदार हेच सुवर्णकाळाचे भागीदार असतात. जिंकलो आणि हरलो तरी कायम साहेबांसोबत एकनिष्ठ” , “लाट बघून ताट बदलायचं नसतं कायम एकनिष्ठ” , “मातीतला कार्यकर्ता माती अंगाला लागली म्हणून कुस्ती करायची सोडत नाही” अशा पाठिंबा देणाऱ्या समर्थकांच्या कमेंट्स त्यांना हा पराभव विसरून नव्याने लढण्याचे बळ द्यायचे काम करतील. 1.1 k लाईक तर 95 कमेंट्स या पोस्टवर आहेत. Shashikant Shinde यूट्यूब चैनलला कम्युनिटीमध्ये ही पोस्ट आहे.
आम्ही सदैव आंबेडकर घराण्यासोबत…
वंचित आघाडीचे श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पराभवानंतर केलेल्या पोस्टमध्ये , ते म्हणतात, ” लोकसभा निवडणुकीत अकोल्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो. मी वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि पक्षाप्रती ठोस समर्पण केल्याबद्दल आभार मानतो. मी नवनिर्वाचित खासदारांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचा पराभव केला.
पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे, पण मी आशा सोडलेली नाही. माझे सहकारी आणि मी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करु आणि त्यांचे विश्लेषण करु आणि आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करु. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो!” बाळासाहेब आंबेडकर यांच्या या फेसबुक पोस्टवर 2.5 k लाईक, 374 कमेंट्स तर 148 जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर एका समर्थकने “तुम्ही निवडणुकीतील पराभवाने निराश होऊ नका, आपली चळवळ जिवंत ठेवा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, निपाणी, 25 डिसेंबर 1953” हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच कमेंट केले आहेत. आणखी काही जणांनी “ये जंग जारी रहेगी”, ” हार-जीत ची परवा न करता स्वाभिमानाने लढला, हे काही कमी नाही” , तर बहुतेकांनी “आम्ही सदैव आंबेडकर घराण्यासोबत आहोत” असा शब्द दिला आहे. “गंगाधर ही शक्तिमान है, बीजेपी ही काँग्रेस है’ असे म्हणत स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. काही असो पण बाळासाहेबांच्यासह वंचितच्या समर्थकांना नक्कीच दिलासा देणाऱ्या या पोस्ट आहेत.
https://www.facebook.com/share/p/xpbjZiDautZxSi3u/?mibextid=xfxF2i
400 चार दर 3400 मिळवून दिला हेच चुकलं…
ऊस उत्पादकांना आंदोलनाच्या माध्यमातून ज्यादा चार पैसे मिळवून देणारे राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातून पराभव झाला. त्यांनी पराभवानंतर “माझं काय चुकलं? प्रामाणिक असणे गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही…” अशी केलेली भावनिक पोस्ट शेतकरी आणि त्यांच्या नेटकरी पोरांच्या जिव्हारी लागली नसेल तर नवलच. 4.4k लाईक्स, 1.2k कमेंट्स आणि 69 जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ” साहेब विधानसभा लढवा, कोणत्या ना कोणत्या सभागृहात तुम्ही असणे महत्वाचे” , “झुठोंकी की दुनिया है साहब यह , सच्चाई की कोई कीमत नही यहा, साहेब और लढेंगे और जितेंगे” , ” राजू शेट्टी साहेबांसारख्या कर्तृत्ववान माणसाला जातीपातीचा रूमणपेच लावून जनता पाडते तेंव्हा कृष्ण नीतीचा अवलंब करावा लागेल” , “शेतकरी हाही धर्म आणि जातीच्या बोगस अस्मितेत अडकून पडला आहे पण हेही दिवस जातील”, “शेतकऱ्यांना आता शेतकरी चळवळीची गरज नाही असं वाटतंय, त्यामुळे साहेब तुम्ही थांबलेले बरं, त्याशिवाय लोकांना अक्कल येणार नाही” , “दुर्दैवी पराभव… शेतकरी वर्गाचे दुर्दैव…निशब्द” , ” शेतकऱ्यांसाठी केलेली कामं शेतकरी विसरला साहेब”, ” शेतकऱ्यांना लढायला शिकवलं, हेच तुमचं चुकलं, 400 चा दर 3400 मिळवून दिला हेच चुकलं.” .” साहेब इथून पुढे आंदोलन बंद करा, घेऊ दे तीन-चार हप्त्यात”, अशा कमेंट्स शेतकऱ्यांनी विशेषता: शेतकऱ्यांच्या नेटकरी पोरांनी केल्या आहेत.
https://www.facebook.com/share/p/TKNTauE8bXTRA7qY/?mibextid=qi2Omg
या कमेंट्स या लढवय्या नेत्यांचे बळ वाढवणाऱ्या ठराव्यात, या पराभवाने खचून न जाता नव्या उर्मीने या नेत्यांनी लढत राहावे, कारण कोणी काहीही म्हटले तरी इतिहास साक्षी आहे वेळ येते तेंव्हा रस्त्यावरच्या लढाईला हेच नेते तत्पर असतात, शेतकरी-कामगारांचा, दीनदुबळ्या वंचितांचा आधार असतात. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलेल्या कविवर्य सुरेश भट यांच्या याच कवितेतील पुढच्या चार ओळी सांगाव्या वाटतात त्या अशा,
” छाटले पंख जरी माझे, पुन्हा उडेन मी ,
अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही
विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही”