तांबवेतील संतांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान – २४ वर्षांची अखंड परंपरा!
पालखी मार्गावर भक्तांचा ओघ ; ठिकठिकाणी उत्साहात स्वागत

कराड, दि.२४ | चांगभलं वृत्तसेवा
श्री संत कृष्णतबुवा महाराज, बापुनाना महाराज, मथुरदास महाराज व कृष्णाबाई यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी काढण्यात येणाऱ्या तांबवे ता. कराड येथील पालखी दिंडी सोहळ्याने यंदा २४ व्या वर्षात प्रवेश केला आहे. आज (२४ जून) भाविकांच्या गर्दीत आणि उत्साही वातावरणात या दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले.
सकाळी पहाटे सहा वाजता श्री बापुनाना मठातून पालखी गांधी चौकातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विधीवत नेण्यात आली. तेथे दिंडी चालक महादेव मोरे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत, पूजाअर्चा करून वाजतगाजत पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.
या दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे तिची धार्मिक शिस्त, पारंपरिक वेशभूषा, अभंग गाण्यांची गूंज आणि गावकऱ्यांचा जिव्हाळा. गावातील आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून वेशीपर्यंत पालखीला निरोप दिला. त्यानंतर तांबवे फाट्यावर व्यापारी पेठेतील व्यापाऱ्यांकडून दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
डोंगरी माळावरील दत्तकृपा पेट्रोल पंपाच्या मालकांनी दिंडीचे भक्तिभावाने स्वागत केले. पुढे पश्चिम सुपने, वसंतगड, आबईचीवाडी, सुपने, विजयनगर, पाडळी, मुंढे-साळवी मळा अशा विविध गावांमध्ये मार्गक्रमण करत पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दिंडी जिथे जिथे पोहोचली, तिथे भक्तिभावाचा ओसंडून वाहणारा उत्सव अनुभवायला मिळाला.
पालखी सोहळा कराड विमानतळावर पोहोचताच फटाक्यांच्या आतषबाजीत तिचे स्वागत झाले. त्यानंतर सोहळ्याचा पहिला विसावा खुशबु ढाबा येथे झाला. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशीलदार यांच्या वतीने पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले.
यानंतर ही दिंडी पुढील मुक्कामासाठी सैदापूरकडे रवाना झाली. करवडी, रायगाव, चितळी, कलेढोण, झरे, दिघंची, चिकमहुद, पळशी, सुपली आणि वाखरी अशा गावांमधून मार्गक्रमण करत ५ जुलै रोजी ही दिंडी पंढरपूरच्या पवित्र भूमीत दाखल होणार आहे.
दिंडीच्या वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर भाविकांचे भरभरून प्रेम, सेवाभाव आणि उत्सवाची चैतन्यदायी अनुभूती मिळत असल्याचे दर्शन यावेळी घडले. अखंड २४ वर्षांची ही परंपरा दरवर्षी अधिक रंगतदार, अधिक भक्तिभावपूर्ण होत चालली आहे.