भाजपचा वारू रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा भिडू मैदानात! – changbhalanews
राजकिय

भाजपचा वारू रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा भिडू मैदानात!

नवे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आहेत तरी कोण?

कराड | हैबत आडके
सातारा जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यानंतर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपने जिल्हाध्यक्ष बदलला आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकांमध्ये प्रथमच जिल्ह्यात एकही जागा जिंकू न शकलेल्या राष्ट्रीय काँग्रेसनेही रणजीतसिंह देशमुख यांच्या माध्यमातून नव्या दमाच्या चेहऱ्याला साताऱ्याच्या जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली आहे. काँग्रेसने मैदानात उतरवलेला हा नवा भिडू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचा उधळत निघालेला वारू रोखण्यात आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवून देण्यात कितपत यशस्वी ठरणार? हा सध्या राजकीय चर्चेचा मुद्दा बनला आहे.

सातारा जिल्ह्याचे राजकारण अलीकडच्या काही वर्षात पुरते बदलून गेले आहे. कधीकाळी जिल्ह्यावर राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला आणि राष्ट्रीय काँग्रेसला उतरती कळा लागली. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने मोठा दबदबा निर्माण केला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही जिल्ह्यात आपले अस्तित्व कायम ठेवत विधानसभेला दोन आमदार निवडून आणले. जिल्ह्यात सध्या भाजपचे एक खासदार तर चार आमदार, शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आमदार निवडून आले आहेत. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. भाजपचे चार आमदार निवडून आल्याने जिल्हाभरात भाजपचा वारू उधळत चालला आहे. तर पक्ष फुटी नंतरही राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद कायम राहिली आहे. त्यातच विधानसभा निवडणुकानंतर स्थापन झालेल्या महायुतीच्या राज्यातील मंत्रिमंडळात जिल्ह्यातून भाजपचे 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 1 तर शिवसेना शिंदे गटाचे 1 असे महायुतीचे चार दिग्गज मंत्री आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात महायुतीचा बोलबाला सुरू असून राष्ट्रीय काँग्रेससह महाविकास आघाडीतील पक्षांचा अस्तित्वासाठीचा राजकीय संघर्ष सुरू आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत भाजपने त्यांना थेट पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावर संधी देत येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची कमान डॉ. भोसले यांच्या हाती दिली आहे. भाजप पक्ष संघटनेतील या बदलानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षानेही पक्ष संघटनेत बदल करत रणजीतसिंह देशमुख यांना प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून मैदानात उतरवले आहे. त्यांच्या माध्यमातून काँग्रेसने माण-खटावकडेच पुन्हा पक्षीय पातळीवर जिल्हास्तरावरील नेतृत्वाची संधी कायम ठेवली आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख हे दुष्काळी खटाव तालुक्यातील मायणी शेजारच्या निमसोड गावचे सुपुत्र आहेत. विद्यार्थी काँग्रेस पासून ते पक्षात कार्यरत आहेत. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. दुष्काळी माण-खटाव तालुक्यात त्यांनी सहकारी सूतगिरण्यांची यशस्वीपणे उभारणी केली आहे. यापूर्वी त्यांनी विधानसभेची एक निवडणूकही लढवली होती. उच्चविद्याविभूषित असलेल्या देशमुख यांना सहकार क्षेत्राचाही चांगला अनुभव आहे. गेल्या काही वर्षात राष्ट्रीय काँग्रेस मधून एका मागून एक असे अनेक दिग्गज बाहेर पडत असताना देशमुख यांनी पक्षावरची निष्ठा कायम ठेवली आहे. त्याची दखल घेत पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्षपदी संधी दिली आहे. असे असले तरी अत्यंत आव्हानात्मक राजकीय परिस्थितीमध्ये देशमुख यांच्याकडे जिल्हा काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली आहे.

भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना लोकसभा व विधानसभा निवडणूकांप्रमाणे जिल्ह्यातील पक्षाचे वर्चस्व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही कायम ठेवावे लागणार आहे. असाच प्रयत्न राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा राहणार आहे.  याउलट राष्ट्रीय काँग्रेसच्या रणजितसिंह देशमुख यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी आणि निश्चित रणनीती आखून त्याप्रमाणे त्यांना काम करावे लागणार आहे. पक्षातील सर्व सेल आणि विशेषतः सोशल मीडिया सेल ऍक्टिव्ह मोड वर ठेवणे. अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून कार्यक्षम कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांच्या कौशल्याचा पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी त्यांना उपयोग करून घ्यावा लागणार आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवून जिल्ह्यातील प्रमुख व सक्षम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला पुढे आणावे लागणार आहे. काँग्रेस सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांची उणीव भरून काढण्यासाठी त्या त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी व ताकद द्यावी लागणार आहे. हे सर्व करत असताना दुसरीकडे मित्र पक्षांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याची भूमिकाही त्यांना पार पाडावी लागणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस समोर थेट आव्हान आहे ते भाजपचे आणि त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे. त्यामुळे एकिकडे भाजपचा वारू आणि दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटालाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिका , नगरपंचायतींच्या निवडणूकांमध्ये देशमुख यांच्या नेतृत्वाचे कसब पणाला लागणार आहे.

रणजीतसिंह देशमुख यांना साताऱ्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम यांची पसंती आहे. देशमुख हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जातात. पक्षातील नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचा त्यांनी आजवर चांगला समन्वय ठेवला आहे. असे असले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पक्षाच्या यशा-अपयशावरच त्यांच्या नेतृत्वाचे मोजमाप होऊ शकणार आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close