कोल्हापूर जिल्ह्यात उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची लेखी हमी – changbhalanews
शेतीवाडी

कोल्हापूर जिल्ह्यात उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची लेखी हमी

राजू शेट्टींच्या आंदोलनाचा दणका : आता सांगली अन् साताऱ्याकडं लक्ष

चांगभलं ऑनलाइन | कराड

तुटून गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता व पहिली उचल ३५०० रूपये या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काल पुणे-बेंगलोर महामार्गावर पंचगंगा पुलावर बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. इतिहासात पहिल्यांदाच तोडफोड न करता महामार्ग ७ तास बंद राहिला , आणि त्याच बंद महामार्गावर शेतकऱ्यांच्या जेवणाच्या पंगती ही बसल्या होत्या. या आंदोलनाच्या दणक्याने कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी तुटलेल्या उसाला ३ हजारांच्या आत दर दिलेल्या साखर कारखान्यांनी प्रतिटन १०० रूपये तर ३ हजारांपेक्षा जास्त दर दिलेल्या कारखान्यांनी प्रतिटन ५० रूपये दुसरा हप्ता देण्याचे आदेश शासन-प्रशासनाकडून काढण्यात आला आहे. याबाबत कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसे लेखी पत्र राजू शेट्टी यांना दिल्यानंतर सायंकाळी चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आलं.

दरम्यान, हा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यापुरताच घेण्यात आला आहे. त्यामुळे सांगली आणि सातारा जिल्ह्याकडे आता स्वाभिमानीसह सर्व शेतकरी संघटनांनी मोर्चा वळविला आहे. त्यामुळे आजपासून सातारा आणि सांगली जिल्ह्यात उसाचा दुसरा हप्ता आणि पहिल्या उचलीचा मुद्दा घेऊन शेतकरी संघटनांचे ऊसदर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल महामार्गावर पंचगंगा पुलावर चक्काजाम केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लेखी पत्र संघटनेला दिले आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील हंगाम सन २०२२-२३ मधील शेतक-यांना मिळालेल्या ऊसाच्या दराविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये ठरविण्यात येत आहे की, मागील हंगामामध्ये शेतक-यांना ऊसाचा दर प्रती टन रुपये ३,००० रूपयांपेक्षा कमी ज्या साखर कारखान्यांनी दिलेला आहे, त्यांनी मागील हंगामातील शेतक-यांना १०० रूपये अतिरिक्त प्रती टन द्यावे व ज्यांनी ३ हजारांपेक्षा जास्त दर प्रती टन दिलेला आहे त्या साखर कारखान्यांनी ५० रूपये प्रतीटन अतिरिक्त शेतक-यांना द्यावेत. याबाबीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित साखर कारखान्यांनी पाठवावा व पुढील दोन महिन्यांमध्ये त्यास मान्यता देण्याचे आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना दिलेले आहे. तसेच, दोन महिन्यानंतर वरीलप्रमाणे अतिरिक्त रक्कम शेतक-यांना साखर कारखान्यांनी देण्याची आहे. तरी सर्व साखर कारखान्यांनी याप्रमाणे आपले संमतीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आणून द्यावे, असे आवाहन सर्व साखर कारखान्यांना पालकमंत्री केले आहे. या आश्वासनाप्रमाणे जिल्ह्यात चालू असणारे मागील हंगामासाठी वाढीव ऊसाचे दर मागणी विषयीचे आंदोलन व चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात येत आहे, असे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मागील ऊसाच्या दुसऱ्या हप्त्याची कोंडी फोडण्यात राजू शेट्टींना यश आले आहे.

सांगली आणि सातारा जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता वाढणार..

चक्काजाम आंदोलनानंतर दुसऱ्या हप्त्याबाबतचा निर्णय हा कोल्हापूर जिल्ह्यापुरता घेण्यात आला आहे. त्यामुळे सांगली आणि सातारा जिल्ह्यात ऊस दर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातारा जिल्ह्यात काल मसूर फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. त्यानंतर जरंडेश्वर साखर कारखाना येथेही ऊस वाहतूक करणारी वाहने तब्बल पाच तास रोखून ठेवण्यात आली. ३० तारखेपर्यंत यावर निर्णय घेण्याचे आश्वासन जरंडेश्वर कारखाना व्यवस्थापनाकडून देण्यात आल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. दरम्यान स्वाभिमानीबरोबरच शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना ही आक्रमक झाली आहे. आज सातारा जिल्ह्यात बनवडी फाटा येथे रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ऊस दर आंदोलन होत आहे. तर सांगली जिल्ह्यातील विशेषतः वाळवा तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आजपासून आंदोलन तीव्र करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष…

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलनानंतर पालकमंत्र्यांनी यशस्वी मध्यस्थी करून तोडगा काढला आहे. मात्र सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार अद्यापही बघ्याच्या भूमिकेत आहेत. या दोन्ही जिल्ह्यात शेतकरी आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री यामध्ये लक्ष घालून उसाचा दुसरा हप्ता आणि पहिल्या उचलेचा प्रश्न सोडवणार का, याकडे आता शेतकरी संघटनांच्यासह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close