कराड शहरातून डॉ. अतुलबाबांना मोठे मताधिक्य देणार : राजेंद्रसिंह यादव – changbhalanews
राजकिय

कराड शहरातून डॉ. अतुलबाबांना मोठे मताधिक्य देणार : राजेंद्रसिंह यादव

यशवंत विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
: महायुती शासनाच्या माध्यमातून डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सुमारे ७५० कोटी रूपयांचा विकासनिधी आणला. तर माझ्या माध्यमातून शहरातील भुयारी गटर, पाणी योजनेसह अन्य कामांसाठी २०९ कोटी आले. कराड दक्षिणचा न भुतो न भविष्यती असा विकास यातून होणार आहे. कराड दक्षिणच्या विकासाची गंगा अशीच अव्याहतपणे ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना कराड शहरातून मोठे मताधिक्य देणार असल्याची ग्वाही यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.

भाजपा – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रमुख कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. अतुलबाबा भोसले, माजी नगराध्यक्षा संगीता देसाई, माजी सभापती स्मिता हुलवान, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, हणमंत पवार, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र माने, सुधीर एकांडे यांच्यासह आघाडीचे माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

श्री. यादव म्हणाले, देशाचे आणि राज्याचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. जनतेने चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम भावी पिढीला भोगावे लागणार आहेत. यामुळे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेल्या महायुतीला पुन्हा संधी देण्याची गरज आहे. ही निवडणूक राज्याला दिशा देणारी असून यात जनतेने दक्षिणमधून डॉ. अतुलबाबा भोसले यांना विजयी करावे.

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, कराड शहरात काम करणारे राजेंद्रसिंह यादव यांचे नेतृत्व मोठे आहे. शहरात विविध विकासकामे ते करत असताना यापुढे त्यात महत्वाचा वाटा उचलण्याचा प्रयत्न भविष्यात करणार आहे.

स्मिता हुलवान म्हणाल्या, राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा धर्म दक्षिणमध्ये १०० टक्के पाळणार आहोत. २०१९ मध्ये यशवंत विकास आघाडीने अतुलबाबांना पाठिंबा दिला होता. गतवेळेपेक्षा यावेळी जास्त ताकदीने आम्ही काम करणार आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून काम केले तर अतुलबाबा निश्चितपणे विजयी होतील. भोसले कुटुंबाने सतत समाजासाठी वाहून घेतले आहे. त्यांनी याचा कधी गर्व केलेला नाही. भोसलेंनी केलेल्या समाजसेवेची परतफेड करण्याची वेळ आली आहे.

यावेळी हणमंतराव पवार, राजेंद्र माने यांची भाषणे झाली. सचिन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close