
सांगली | हैबत आडके
सांगलीच्या राजकीय पटावर मोठं नाट्य घडलं आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या घराण्यातील असलेल्या जयश्री पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय वर्तुळात नवा भूकंप घडवला आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलं होतं आणि आज त्या चर्चांना अधिकृत मोहोर लागली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जयश्री पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा आणि माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी असलेल्या जयश्री पाटील यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठं राजकीय खिंडार पडलं आहे.
वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचा भाजपकडे वळलेला हा कल, सांगलीच्या राजकीय समीकरणात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण या घराण्याचे सांगली जिल्ह्यात गेल्या अनेक दशकांपासून असलेले प्रभावी वर्चस्व सर्वश्रुत आहे. त्यामुळे जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे पक्षासाठी एक मोठा ‘गेमचेंजर’ ठरू शकतो, असं राजकीय जाणकारांचं मत आहे.
या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सांगली महापालिका, जिल्हा परिषद, खासदार व आमदार पदांवर भाजपची जोरदार कामगिरी झाली आहे. पण अजूनही काही महत्त्वाची मंडळी पक्षाबाहेर आहेत, त्यांना योग्य व्यासपीठ मिळावं, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. जयश्री ताईंसारख्या वजनदार नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश हा आमच्या या प्रयत्नाचं यश आहे.”
फडणवीस पुढे म्हणाले, “ताईंनी आग्रह केला होता की, त्यांच्या प्रवेशप्रसंगी मी हजर राहावं. मुख्यमंत्री म्हणून प्रवेशासाठी उपस्थित राहणं अपवादात्मक असतं, पण वसंतदादांच्या वारशाचा सन्मान म्हणून मी स्वतः इथे आलो.”
पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या मेहनतीचंही मुख्यमंत्र्यांनी खास कौतुक केलं.
जयश्री पाटील यांच्या प्रवेशानंतर सांगलीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येण्याची शक्यता आहे.
जयश्रीताई पाटलांच्या भाजप प्रवेशाने सांगलीच्या राजकारणात उलथापालथ..
जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश हा सांगलीतील राजकारणासाठी निव्वळ ‘पक्षांतर’ नसून, राजकीय समिकरणांची मोठी फेररचना मानली जात आहे. त्याचे काही महत्त्वाचे परिणाम येणाऱ्या काळात पुढीलप्रमाणे दिसू शकतात:
🟠 1. काँग्रेसला वारसा गमावण्याचा फटका…
वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे आधारस्तंभ होते. त्यांचं घराणं काँग्रेसच्या ताकदीचं प्रतीक मानलं जायचं. त्या घराण्यातील प्रमुख चेहरा भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसची लोकल पातळीवरील साखळी ढासळू शकते.
🟠 2. भाजपला ग्रामीण भागात बळकटी…
जयश्री पाटील यांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रभाव आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि सहकार क्षेत्रातील भाजपची घुसखोरी आता अधिक सशक्त होऊ शकते.
🟠 3. विरोधकांमध्ये नवा पर्याय शोधण्याची प्रक्रिया वाढेल…
काँग्रेस कमजोर होत असताना विरोधकांमध्ये नवा पर्याय शोधण्याची प्रक्रिया वाढेल. अशावेळी काँग्रेस शिवाय अन्य पक्ष व आघाड्यांना विरोधी पातळीवर बळकटी मिळून विरोधकांमध्ये नवा पर्याय पुढे येऊ शकतो.
🟠 4. भाजपचा ‘ब्राह्मण + मराठा + सहकार’ फॉर्म्युला बळकट…
जयश्री पाटील या मराठा समाजातील असून सहकारातही त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे भाजपच्या सामाजिक समीकरणात नवा घटक जोडला गेल्याचा लाभ भाजपला आगामी काळात मिळू शकतो.
जयश्री पाटील यांचा भाजप पक्षप्रवेश सांगलीतील पारंपरिक काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावणारा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ‘राजकीय टायमिंग शॉट’ ठरणार आहे.