
सातारा/पुणे | चांगभलं वृत्तसेवा
राज्यभर सुरू झालेल्या शाळा प्रवेशोत्सव २०२५ अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्प, चॉकलेट व साहित्य देत स्वागत केले आणि त्यांच्याशी संवाद साधत शिक्षणासोबत संस्कारांचाही महत्वाचा संदेश दिला.
सातारा जिल्ह्यातील कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘माझी शाळा – आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या नव्या शाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट देत स्वागत करताना अभ्यास करून मोठं व्हा आणि देशाच्या नावलौकिकात भर घाला, असे आवाहन केले.
यावेळी आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व शिक्षक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, “शाळा म्हणजे संस्कारांचे मंदिर असून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडा, कला आणि संस्कृतीमध्येही सहभाग घ्यावा. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही देशाच्या सर्वच क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली आहे.”
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आलेगाव पुनर्वसन येथील जिल्हा परिषद शाळेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांना मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश व बूट वाटप केले.
यावेळी गटविकास अधिकारी महेश ढोके, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन, माजी जि.प. सदस्य वीरधवल जगदाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.
अजित पवार यांनी यावेळी सांगितले की, “शासनाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मोफत शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिवाय, प्रत्येक विद्यार्थ्याने एका झाडाची लागवड करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे, यासाठी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात झाली आहे.”
शिक्षकांनी केवळ विषय अध्यापन न करता विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजावेत, अशी अपेक्षा या दोन्ही कार्यक्रमांमधून व्यक्त करण्यात आली.