
कराड, दि. २८ | चांगभलं वृत्तसेवा
परतूर (जि. जालना) येथील आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा शेतकरी कामगार पक्षाने जोरदार निषेध केला आहे. पक्षाच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती समितीच्या कराड येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष ॲड. भाई समीर देसाई यांनी यावर रोष व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली.
विवादित वक्तव्याने खळबळ…
लोणीकर म्हणाले होते, “तुमचा खर्च आम्ही दीड हजार रुपये देऊन भागवतो – तुमच्या बायका-मुलींचे कपडेही त्यातून घेतले जातात!“. हे वक्तव्य अत्यंत निंदनीय असून, त्यातून सरकारचा अहंकार आणि शेतकऱ्यांबाबत असलेला हीन दृष्टिकोन दिसून येतो, असा आरोप शेकापच्या मध्यवर्ती समितीकडून करण्यात आला.
“सत्तेची धुंदी आणि शेतकऱ्यांचा अवमान” – समीर देसाई यांचा हल्लाबोल…
“या सरकारला सत्तेची धुंदी चढली आहे. रोज कुणीतरी मंत्री-आमदार शेतकऱ्यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने करत आहेत,” असे ॲड. देसाई म्हणाले. त्यांनी हे ही स्पष्ट केले की, “2014 नंतर शेतकरी सरकारच्या पैशांवरच पेरणी करू लागले, असा खोटा प्रचार करण्यात येतोय. पण शेतकरी बियाणे, औषधे, खते, यंत्रसामग्री खरेदी करताना GST चा टॅक्स भरतो”
“शेतकरी टॅक्स भरत नाही” – एक अपप्रचार!…
सरकारमधील लोक सातत्याने शेतकरी हा ‘टॅक्स भरत नाही’, ‘नेहमी कर्जमाफी मागतो’ असा अपप्रचार करतात. त्यामुळे समाजात शेतकऱ्यांकडे तुच्छतेने पाहिलं जात आहे. समाजाच्या नजरेत शेतकऱ्यांना कमी लेखण्याचे हे षडयंत्र असल्याची टीका अॅड. देसाई यांनी केली.
हमीभाव नाकारल्याने शेतकऱ्यांची उपेक्षा…
2014 साली सोयाबीनला मिळणारा सहा हजार रुपये दर, आज 2025 मध्ये केवळ चार हजार रुपये व्यापाऱ्यांकडून मिळतो आहे. ही तफावत फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीतच का? भाजीपाल्याला थोडा भाव मिळाला की महागाई सुरू झाल्याची ओरड होते, पण ऊस, कापूस, सोयाबीन व भाजीपाल्याला दर देताना सरकार आणि व्यापाऱ्यांकडून दुर्लक्ष होतं, यावरही बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला.
“हमीभाव दिला, तर शेतकरी कोणाच्या पुढे हात पसरणार नाही”…
“शेतकऱ्याला जर त्याच्या मालाचा योग्य हमीभाव मिळाला, तर त्याला कोणत्याही राजकीय नेत्यापुढे हात पसरण्याची गरज भासणार नाही, असंही भाई ॲड. समीर देसाई यांनी स्पष्ट केलं.
बैठकीस उपस्थित मान्यवर..
या बैठकीला भाई एम. आर. जाधव, भाई दिनकर गुरव, अनिल जगताप, गणेश जगताप, भाई पोपटराव जगताप, ॲड. सयाजीराव कवळे, ॲड. पंडितराव गायकवाड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.