
मुंबई , दि. २८ | चांगभलं वृत्तसेवा
महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा प्रस्ताव आणल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली मातृभाषा मराठीवर अन्याय केल्याचा आरोप विविध स्तरांतून होत आहे.
या हिंदी सक्ती विरोधात ५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) ने ठाम पाठिंबा दर्शवला असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा सदस्य जयंत पाटील यांनी राज्यातील सर्व मराठी भाषिकांना, पालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पाटील म्हणाले, “कुणालाही हिंदीसह विविध भाषा शिकण्यास विरोध नाही. मात्र इयत्ता पहिलीपासूनचं शिक्षण मातृभाषेतूनच व्हावं, ही भूमिका योग्य आणि आवश्यक आहे. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली मातृभाषेला डावलले जात असेल, तर मराठी माणूस एकदिलाने विरोध करणार.”
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न असेल तर आम्ही महाराष्ट्रासाठी, आणि राष्ट्रहिताचा मुद्दा असेल तर राष्ट्रासाठी पक्षीय भेद बाजूला ठेवून ठामपणे उभे राहतो, हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ यांचे धोरण आहे.”
या निर्णयाविरोधात विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही असंतोष आहे. बालवयात मातृभाषेऐवजी दुसरी भाषा बंधनकारक करणे ही शैक्षणिकदृष्ट्या चुकीची भूमिका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
🗓️ मोर्चा तपशील:
दिवस: शनिवार, ५ जुलै २०२५
स्थळ: गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान, मुंबई
📰 “आपल्या गावाची, आपल्या मनातली बातमी – फक्त चांगभलं न्यूजवर!”
📲 खालील प्लॅटफॉर्मवर आम्हाला Follow / Subscribe करा: 📷 Instagram ▶️ YouTube 🐦 X
📘 Facebook 🗞️ Dailyhunt
❤️ Like करा ↗️ शेअर करा 🔔 रहा अपडेट