आषाढी वारीसाठी श्री मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळा प्रस्थानास सज्ज!

कराड, दि. 23 | हैबत आडके
पंढरीची वारी पाहिली | भाग्य समजावे काळी ||”
नाथसंप्रदायाच्या महान परंपरेतील एक तेजस्वी अध्याय म्हणजे श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळा, वारकरी संप्रदायाच्या संतपरंपरेला उजाळा देणारा आणि भक्तिभावाने ओथंबलेला हा पालखी सोहळा यावर्षी देखील भव्यतेने पार पडणार आहे. बुधवार, २५ जून २०२५ रोजी सकाळी ५ वाजता भव्य मिरवणुकीने श्री क्षेत्र किल्ले मच्छिंद्रगड येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे..
लहान मोठ्या अनेक दिंड्या, हजारो वारकरी, निनाद करणारे टाळ-मृदंग आणि “ज्ञानोबा-तुकाराम”चा जयघोष – अशा भक्तिभावाच्या वातावरणात हा पालखी सोहळा ५ जुलै २०२५ रोजी पंढरपूर येथे पोहोचेल.
🛕 तीर्थक्षेत्र श्री किल्ले मच्छिंद्रगड – नाथ संप्रदायाचे पवित्र स्थान…
सह्याद्रीच्या कुशीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात उंच डोंगरावर वसलेला किल्ले मच्छिंद्रगड हा नाथसंप्रदायाचे एक पवित्र आणि जागृत तीर्थक्षेत्र मानला जातो.
इथेच जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांनी तपश्चर्या केली. त्यांच्या सान्निध्यात वारकरी भक्ती, योग व नाथ तत्वज्ञान यांचा संगम अनुभवतात. येथूनच महाराजांची पालखी दरवर्षी पंढरपूरच्या वारीसाठी पायी प्रस्थान करते.
📿 वारीचा अध्यात्मिक प्रवास – पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी!
जगद्गुरु श्री मच्छिंद्रनाथ महाराजांची पालखी वर्षानुवर्षे पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी निघते. वारीत किल्ले मच्छिंद्रगड, सज्जनमाची, रेठरे बुद्रुक, शिवनगर, खुबी, रेठरे खुर्द, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, रेठरे हरणाक्ष, नरसिंहपूर, गोंदी, शेणोली, शेरे स्टेशन या परिसरातील श्रीनाथ भक्त, वारकरी मंडळी हजारोंच्या संख्येने अत्यंत श्रद्धेने सहभागी होतात.
“चांगभलं रं चांगभलं…श्री नाथाच्या नावानं चांगभलं…’ आणि ‘ज्ञानोबा माऊली…” चा गजर करत, टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तांची ही वारी भक्तीचा महासागर निर्माण करत भूलोकीचे वैकुंठ असलेल्या पंढरीला जात असते.
🌸 भक्तीचा उत्कट आविष्कार! – पालखी सोहळ्याचे रिंगण…
वारकरी संप्रदायाचा एक अनमोल सोहळा, वारीतील सर्वांत भक्तिभावपूर्ण क्षण म्हणजे रिंगण. या सोहळ्यात पालखी समोर, धुळीने भरलेल्या माळावर संतांची घोडदौड होते, जणू भक्तांच्या श्रद्धेवरूनच देव चालत जातो! या रिंगण सोहळ्यावेळी संपूर्ण परिसरात अध्यात्माची ऊर्जा दरवळत असते.
यंदा २७ जून रोजी आळसुंद ते रेवणगाव यादरम्यान पहिले रिंगण आणि १ जुलै रोजी तडवळे ते आटपाडी मार्गावर दुसरे रिंगण भक्तीरसात रंगणार आहे. श्री नाथांच्या अश्वांची नेत्रदीपक दौड हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असते.
याधील घोड्यांचे रिंगण, पालखीसमोर नृत्य करणारे वारकरी, टाळ मृदंगाचा नाद – हे सारं वातावरण भाविकांना अध्यात्मिकतेच्या शिखरावर घेऊन जातं.
🛕 पालखी सोहळ्याची वैशिष्ट्ये:
१. आषाढी वारी निमित्त श्री मच्छिंद्रनाथ महाराज पालखी प्रत्येक वर्षी पंढरपूरकडे प्रस्थान करते.
२. प्रत्येक मुक्कामी भाविकांचे उत्स्फूर्त स्वागत आणि महाप्रसादाचे आयोजन होते.
३. पालखी मार्गातील ताकारी, आटपाडी, सुलतानगादे, लोटेवाडी, महूद बु., पळशी अशा गावांमध्ये विश्रांती व विविध धार्मिक कार्यक्रम होतात.
४. शिस्तबद्ध दिंड्या, प्रवचन, कीर्तन, भजन, यांमधून आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं.
५. पालखी मार्गावरील ग्रामस्थ, सेवाभावी संस्था, तरुण मंडळ यांचा समर्पित सहभाग असतो.
६. भाविकांसाठी आरोग्यसेवा, पाण्याची व्यवस्था, स्वच्छता यावर विशेष भर असतो.
७. श्री मच्छिंद्रनाथ पालखी सोहळा विश्वस्त मंडळ, किल्ले मच्छिंद्रगड यांच्यावतीने सर्व नियोजन सुरळीत पार पडणार आहे.
🚩पालखी मार्ग व मुक्काम ठिकाण :
किल्लेमच्छिंद्रगडच्या श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याचे २५ जून २०२५ रोजी किल्लेमच्छिंद्रगड येथून भव्य प्रस्थान होत आहे. या दिवशी पालखी किल्लेमच्छिंद्रगडहून ताकारीकडे मार्गस्थ होईल. २६ जून रोजी ताकारी ते आळसुंद, २७ जून रोजी आळसुंद ते रेवणगाव (पहिले रिंगण), तर २८ जून रोजी रेवणगाव ते सुलतानगादे असा पालखी सोहळा पुढे सरकणार आहे. २९ जूनला सुलतानगादे ते करगणी, आणि ३० जून रोजी करगणी ते तडवळे येथे पोहोचणार आहे. १ जुलै रोजी तडवळे ते आटपाडी (दुसरे रिंगण), तर २ जुलै रोजी आटपाडी ते लोटेवाडी नवी असा प्रवास होईल. त्यानंतर ३ जुलै रोजी लोटेवाडी नवी ते महुद बु., ४ जुलै रोजी महुद बु. ते पळशी, आणि अखेरीस ५ जुलै २०२५ रोजी पालखी पवित्र पंढरपूर नगरीत दाखल होणार आहे. या संपूर्ण सोहळ्यात विविध ठिकाणी पालखीचे थांबे, रिंगण सोहळे व भजनसंध्या होणार असून, हजारो नाथभक्त पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत.
📢 सहभागी भाविकांना आवाहन…
श्री मच्छिंद्रनाथ पालखी सोहळा हा केवळ परंपरा नाही तर संघटित भक्तीचा अनुभव आहे.
या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांनी वेळेचे व शिस्तीचे पालन करावे.
पालखीच्या सर्व मुक्कामांवर सामूहिक महाप्रसाद, आरती व हरिपाठाचे होत असतो, सोहळ्यातील भाविक भक्तांनी, वारकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेऊन भक्तीचा अनुभव समृद्ध करावा.