साताऱ्यात काँग्रेस नव्याने उभी राहणार! रणजीतभैय्यांचा तरुण नेतृत्वावर भर

कराड, 21 जून 2025 | चांगभलं न्यूज प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटनेत पडझड झाल्याची कबुली देत, नव्या दमाच्या नेतृत्वाला पुढे आणून पुन्हा पक्ष मजबूत करण्याचा निर्धार काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रणजीतभैय्या देशमुख यांनी कराड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष हाताच्या चिन्हावरच लढणार आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
या पत्रकार परिषदेला रणजीतभैय्यांसोबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे खजिनदार बाबासाहेब कदम, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, तसेच इंद्रजित चव्हाण, ऋतुराज मोरे, बंडानाना जगताप, अमित कदम, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष संजय तडाखे, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रतापराव देशमुख, तसेच अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, पाटण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष कदम, नरेंद्र पाटणकर, पांडुरंग यादव, आनंदराव नांगरे, रवींद्र कांबळे, सतीश कांबळे, राजन कदम, सुनील गायकवाड, सुनील बरीदे, मोहन शिंगाडे यांसारखे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
♦️मनोहर शिंदे यांच्या भूमिकेबाबत सस्पेन्स कायम…
दरम्यान, पत्रकार परिषदेत मनोहर शिंदे यांच्याबाबत जिल्ह्यातील चर्चेचा गुंता उलगडण्याचा प्रयत्न झाला. गेल्या काही काळात कराड दक्षिणमधील काही नेते पक्षातून बाहेर पडले आहेत. त्याच तयारीत मनोहर शिंदे असल्याची चर्चा सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. पत्रकारांनी थेट विचारणा करताच रणजीतभैय्या देशमुख म्हणाले, “अफवांवर विश्वास ठेवू नका, मनोहर शिंदे कुठेही जाणार नाहीत. ते काँग्रेसमध्येच आहेत आणि राहणार आहेत,” असा ठाम दावा केला.
मात्र या प्रश्नावर स्वतः मनोहर शिंदे यांनी उत्तर देण्याचे टाळत, फक्त हात हलवून ‘मी सध्या इथेच आहे’ असे खुणावले. त्यांचा चेहऱ्यावर मिश्किल हसू होते, पण स्पष्ट भूमिका नव्हती. त्यामुळे उपस्थित पत्रकार आणि नेत्यांमध्ये एकच कुजबुज सुरू झाली – शिंदे राहणार की जाणार?
या संपूर्ण प्रसंगातून एक बाब स्पष्ट झाली की मनोहर शिंदेंच्या राजकीय भूमिकेबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. या स्थितीत रणजीतभैय्यांनी दिलेला विश्वासाचा दिलासा पुरेसा ठरतो का, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
🗣️ आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनीती तयार | तरूणाईकडे कल…
यावेळी रणजीतभैय्या देशमुख म्हणाले, “जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याने जिल्ह्यात संपूर्ण संघटनेची नव्याने बांधणी केली जाणार आहे. यामध्ये ज्येष्ठांसोबतच तरुणांनाही प्राधान्य दिलं जाणार आहे. कार्यकर्त्यांच्या कामाचे नियमित मूल्यमापन केले जाईल आणि अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांविषयी वेळेवर निर्णय घेण्यात येईल.”
सातारा जिल्ह्यात जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष कुठेही कमी पडणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. रणजीतभैय्यांनी स्पष्ट केलं की, आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनीती तयार आहे.
🔷 महापुरुषांना अभिवादन करत कराड दौऱ्याची सुरुवात…
जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर प्रथमच कराड दौऱ्यावर आलेल्या रणजीतभैय्यांनी शिवतीर्थ दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज, कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधी, प्रीतीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण समाधी, बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
यानंतर पाटण कॉलनी येथील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांनी स्व. दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण व स्व. प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यानंतर दुपारी २ वाजता रेठरे बुद्रुक येथे जाऊन स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या प्रतिमेलाही अभिवादन केलं.