कराडमध्ये देशभक्तीचा उत्सव – कारगिल विजय कलशास हजारो हातांनी सलाम!

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
देशासाठी बलिदान दिलेल्या कारगिल योद्ध्यांच्या स्मृती जपणाऱ्या ‘कारगिल विजय कलश’चे कराड रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले. विजय दिवस समारोह समितीच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात कलशाचे पूजन करून शूरवीरांना मानवंदना अर्पण करण्यात आली.
दिल्ली येथील सिटीझन्स सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या २६ व्या विजय कलश मोहिमेचे नेतृत्व मेजर जनरल पूरोहित, ब्रिगेडियर रवी मुनिस्वामी, कर्नल पी. व्ही. हरी यांनी केले. त्यांच्या टीमचे ‘योद्धा सह्याद्री’चे कर्नल संभाजी पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, गौरव ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
विजय कलश यात्रा नवी दिल्ली येथून सुरू झाली असून, देशभर प्रवास करत २६ जुलै रोजी कारगिल, द्रास सेक्टर येथे संपन्न होणार आहे. कराड येथील स्वागतसमारंभात विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव सुभेदार विलासराव जाधव प्रमुख उपस्थित होते.
या वेळी वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, उद्योगपती सलीमभाई मुजावर, स्टेशन मास्टर अनिल शिंदे, राजीव आपिने सर, प्रा. जालिंदर काशीद, प्राचार्य गणपतराव कणसे, आत्माराम अर्जुगडे, प्रसाद पावसकर, अभियंता ए. आर. पवार, विजय खबाले तसेच छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप व एनव्हायर क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे रेल्वे स्थानकप्रमुख अनिल शिंदे यांनी रेल्वेची वेळ पाच मिनिटांनी वाढवून घेऊन, कलश पूजन आणि पुष्पांजली समारंभ सुरळीत पार पाडण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.