
मुंबई | हैबत आडके
मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. अनेक नागरिक या दुर्घटनेत वाहून गेले असून, काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अद्याप हानीचा नेमका अंदाज लावलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर लिहिलं:
🗣️ “हा पूल धोकादायक होता, तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली? पूल पाडून नव्याने बांधला का नाही? सरकारमध्ये बसलेल्यांची एकच साचेबद्ध प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य सुरु आहे आणि आम्ही पाठीशी आहोत’… पण ही वेळच का यावी?”
ते पुढे म्हणाले:
🛑 “सरकारचे इतके विभाग नक्की काय करतात? पावसाळ्यापूर्वी धोकादायक पूल, रस्ते याची तपासणी होऊन उपाययोजना का होत नाहीत? जर प्रशासन काम करत नसेल, तर सत्ताधारी तरी झोपलेत का?”
तसेच जनतेलाही त्यांनी सल्ला दिला:
⚠️ “लोकांनी उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. कुटुंबाबरोबर धोकादायक ठिकाणी जाणं टाळा. सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, पण आपल्यालाही भान हवंच.”
राज ठाकरेंनी मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत ही घटना “शासनाच्या निष्काळजीपणाचं ताजं उदाहरण” असल्याचं म्हटलं आहे. पावसाळा नुकताच सुरू झाला असताना पूल कोसळणं, रस्त्यांची चाळण होणं, शहरं जलमय होणं या सर्व गोष्टींवर युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचं आवाहन त्यांनी केलं.