कराडकरांच्या प्रेमामुळे मिळालेल्या सत्तेचा उपयोग व्यक्तिगतपेक्षा सार्वजनिक प्रगतीसाठीच केला : आ. पृथ्वीराज चव्हाण
जुने मालखेड, मालखेड, रेठरे खुर्द, वाठार, आटके भागात प्रचार दौरा ; मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद.

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराडच्या जनतेच्या विश्वासामुळेच मला केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. कराडच्या नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतल्या पासून ते अमेरिकेत इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केल्यानंतरही कराडकरांच्या प्रेमामुळेच मला राजकारणात काम करण्याची संधी मिळाली. आई वडिलांचे संस्कारच समाजसेवेचे असल्यामुळे आजपर्यंत मिळालेल्या सत्तेचा उपयोग व्यक्तिगत प्रगतीपेक्षा सार्वजनिक व सामाजिक प्रगतीवर भर दिला. त्यामुळेच आजच्या राजकीय परिस्थितीत सुद्धा ताठ मानेने सन्मानाने राहत आहे. असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कराड दक्षिणमध्ये कोट्यवधीची विकास कामे केली. पण गेली साडे सात वर्षे भाजपचे सरकार असल्याने मतदारसंघात विकास निधी आणण्यात अनेक अडथळे आली पण तरीही अडीच वर्षाच्या सत्ता काळात आणि प्रशासनातील कामकाजची माहिती म्हणून कोट्यावधीचा निधी पुन्हा एकदा कराड दक्षिण साठी आणता आला. लोकसभेच्या निवडणुकीत खोके सरकारचा जनतेने पराभव केला. याची पुनरावृत्ती विधानसभेत होणार आहे. राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कराड दक्षिणेचा विकास पुन्हा त्याच जोमाने होईल, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
जुने मालखेड, मालखेड, रेठरे खुर्द, वाठार, आटके येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. शिवाजीराव मोहिते, अॅड नरेंद्र नांगरे – पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण, दिग्विजय पाटील, संजय तडाखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, लाडकी बहिण, भाऊबीजेची ओवाळणी हा दूजाभाव न करता त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आमचे सरकार आल्यानंतर महिलांना प्रतिमहा तीन हजार रुपये देणार आहोत. त्याचबरोबर महिलांना मोफत एसटी प्रवास करणार आहोत. महिलांचा वर्ग अर्थव्यवस्थेत आल्याशिवाय देश पुढे जाणार नाही. हे ओळखून आम्ही विकासाचा अजेंडा तयार केला आहे.
ते म्हणाले, कृष्णाकाठी विकासाच्या योजना काँग्रेसमुळे उभ्या राहिल्या. तुम्ही केवळ आमदार निवडत नाही. तर सरकार निवडायचे, हे ठरवणारी निवडणूक आहे. फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार आणायचे की, पुन्हा वर्ण व्यवस्था आणणाऱ्या प्रवृत्तींना आपण बळ द्यायचे, हे मतदारांनी ठरवावे.
मालखेड येथील बैठकीत रविकिरण पाटील म्हणाले, अतुल भोसले यांच्या गटाकडे आश्वासनांचा पाऊस आणि एका बाजूला पृथ्वीराज बाबांचा खरा विकास दिसत आहे. विरोधक फसवी आश्वासने देत आहेत. निवडणुका आल्या की, त्यांच्या युवा मोर्चा, संघटना या गोष्टींना ऊत येतो. अतुल भोसले यांनी लाल दिव्याचा भोंगा वाजवत मालखेड गावात येवून रांगोळ्या रेखाटून केलेल्या भूमिपूजनाचे पुढे काय झाले? असा सवाल त्यांनी केला.
माजी सरपंच चंद्रकांत पवार म्हणाले, गेल्या पन्नास वर्षापासून या गावात हाताच्या चिन्हाशिवाय दुसरे काही माहिती नाही. हाताची बोटे गळून पडणार नाहीत. पण कामळाच्या पाकळ्या कधी गळून पडतील, हे सांगता येत नाही.