
चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कराड तालुक्यातील श्नी क्षेत्र पाल येथील श्नी खंडोबा-म्हाळसा यात्रेचा मुख्य दिवस यंदा सोमवार दि. 22 जानेवारी हा आहे. या वर्षी होऊ घातलेल्या यात्रेसाठी प्रशासन व देवस्थान समिती, ग्रामपंचायत प्रशासनाने यात्रेची तयारी पूर्ण केली आहे. अवघी पालनगरी श्नी खंडेराया-म्हाळसा विवाह सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. आतुरता आहे ती सोमवार दि. 22 जानेवारीच्या गोरज मुहूर्ताची.
पाल यात्रेला , विशेषता : मुख्य विवाह सोहळ्यासाठी तीन राज्यातून आलेले सुमारे पाच ते सात लाख भाविक उपस्थित असतात. त्यामुळे दरवर्षी भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, तसेच यात्रा सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनासह यात्रा कमिटी व ग्रामपंचायत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असते. काही दिवस अगोदर यात्रेचे नियोजन करावे लागते त्यासाठी विविध विभागांचा समन्वय साधावा लागतो. यंदाही या पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे.
तात्पुरत्या पुलाच्या जागी आता कायमस्वरूपी पूल…
दक्षिण वाळवंटात रथ मार्गावर तारळी नदी ओलांडण्यासाठी पूर्वापार तात्पुरता पूल तयार करण्यात येत होता. हत्तीवरून मिरवणूक निघत होती तेंव्हाही आणि आता रथामधून मिरवणूक निघत असतानाही तात्पुरत्या पूलावरूनच देवाची मिरवणूक पुढे जात होती. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी पूल बांधण्यात यावी , अशी मागणी होत होती. ती पूर्ण झाली असून आता तात्पुरत्या पूलाची जागा कायमस्वरूपीच्या भक्कम पूलाने घेतली आहे. कालच त्याचे उद्घाटन झाले असून पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे यात्रे दरम्यान मुख्य पुलावर होणारी वाहतूक कोंडीही टाळता येणे पोलीस प्रशासनाला शक्य होणार आहे. तसेच यात्रा कालावधीत मुख्य मंदिराच्या शेजारी होणारी गर्दी ही आता नियंत्रणात येणार आहे.
मंदीर परिसर, लग्न मंडपावर सीसीटीव्हीची वाॅच…
याबरोबर काशीळ-हरपळवाडीमार्गे येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनबारीचे काम पूर्ण झाले आहे. उत्तरेकडील वाळवंटात यात्रेसाठी मेवामिठाईची दुकाने, सिनेमागृहे, पाळणे यासह तंबू उभारण्यात आले आहेत. यात्रेत भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी वॉच टॉवर उभारले आहेत. देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात व लग्न सोहळा मंडपात अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे टवाळखोरांवर पोलिसांबरोबरच सीसीटीव्हीचा वाॅच राहणार आहे.
पोलीस प्रशासनाकडून वाॅच टॉवरची उभारणी…
दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेतील चोरट्यांच्यावर तसेच टावळखोरांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून दक्षिणेकडील वाळवंटात वाॅच टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. दुर्बिण व व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून पोलिसांकडून या वाॅच टाॅवरवरून संपूर्ण दक्षिण बाजुकडील वाळवंटावर वाॅच ठेवला जाणार आहे. उंब्रज पोलीस ठाण्यासह कराड व पाटण विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही यात्रा कालावधीत भेट देणार असून यात्रेचे अपडेट्स घेत राहणार आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल , असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
भाविकांचा ओघ सुरू…..
काशीळ-पाल या मुख्य रस्त्यालगत मेवा, मिठाई, खेळणी व छोटी हॉटेल व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. यात्रेसाठी लांबून येणाऱ्या भाविकांचा आतापासूनच ओघ सुरू झाला आहे. पालनगरीत मल्हार भक्तांची वर्दळ सुरू झाली आहे.
तात्पुरते बसस्थानक आदर्शनगरमध्ये….
एसटी प्रशासनाने काशीळ- पाल मार्गावर आदर्शनगर येथे तात्पुरते बस स्थानक सुरू केले आहे. लांब पल्ल्यावरून येणाऱ्या भाविकांना सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन ही सज्ज झाले आहे. आरोग्य विभागाने वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवली आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा समिती तसेच सर्व शासकीय विभाग यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी तत्पर आहेत.