
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
देशातील शून्य ते २८ वर्ष वयोगटातील ४० कोटी लोक हे भविष्यात फक्त देशाचे नाही; तर जगाचे नेतृत्व करणार आहेत. या वयोगटातील लोकांना सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे नव्या भारताच्या सक्षम नेतृत्वासाठी आणि राष्ट्राच्या निर्मितीत विद्यार्थ्यांनी व युवापिढीने योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी केले. विद्यानगर – सैदापूर (ता. कराड) येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात नवमतदार व युवकांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार प्रमोद जठार, प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, रामकृष्ण वेताळ, श्रीनिवास जाधव, माजी जि. प. सदस्य सागर शिवदास, माजी पं. स. सदस्य चंद्रकांत मदने, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, सैदापूरचे माजी उपसरपंच मोहनराव जाधव, सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष धनाजी जाधव, मुकुंद चरेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थी – युवकांशी संवाद साधताना ना. मिश्रा म्हणाले, भारतात हजारो वर्षांपासून ज्ञानाची परंपरा आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना आपण हजारो वर्षांपूर्वी स्वीकारली. ज्या-ज्यावेळी आपल्या देशावर आक्रमणे झाली; लूट झाली, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांनी युद्ध करुन आपल्या देशाला आक्रमकांपासून वाचविले. १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. पण देशाच्या स्वातंत्र्यानंतर सत्तेवर विराजमान झालेल्या सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे देश पुढे जाऊ शकला नाही. २००४ ते २०१४ हा १० वर्षांचा कालखंड तर देशासाठी अतिशय खराब होता. पण त्यानंतर मात्र देशासाठी तब्बल ३० वर्षे आपले जीवन व्यतित करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशात पूर्ण बहुमताचे सरकार आले आणि खऱ्या अर्थाने देशाला पुढे घेऊन जाण्याचे काम सुरू झाले.
गेल्या १० वर्षात महिला, शेतकरी, विद्यार्थी, युवा, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच क्षेत्रातील लोकांना डोळ्यापुढे ठेऊन विकासाची कामे होऊ लागली आहेत. पंतप्रधान मोदींच्या या कामामुळे आज भारत देश जगाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनला आहे. भारतच संपूर्ण जगाचे नेतृत्व करू शकेल, असा विश्वास संपूर्ण जगातील नेतृत्वाला वाटू लागला आहे. अशावेळी राष्ट्राच्या निर्मितीत विद्यार्थी आणि युवापिढीने योगदान द्यावे, असे आवाहन ना. मिश्रा यांनी केले.
प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी स्वागत व प्रास्तविक केले. उपप्राचार्य एस. ए. पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.