सातारा जिल्ह्यात भाजप जिल्हाध्यक्षांच्या कारखान्याने फोडली ऊसदराची कोंडी
वर्धन अॅग्रो १ डिसेंबर पासून अंतिमदर प्रतिटन ३१११ रपये तर मालक तोडीच्या ऊसाला अंतिम दर ४१११ रूपये देणार

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कोल्हापूरला ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला असून सांगली आणि सातारा जिल्ह्यात ऊसदर आंदोलन सुरू असतानाच सातारा जिल्ह्यातील भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या कारखान्याने ऊसदराची कोंडी फोडत १ डिसेंबरपासून गळिताला येणाऱ्या उसाला अंतिम दर जाहीर केला आहे. वर्धन अॅग्रो कारखाना कार्यस्थळावर चेअरमन धैर्यशील कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत वर्ध अॅग्रो कारखान्यास १ डिसेंबर पासून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन अंतिमदर ३१११ रु.तर मालकतोडीने (खुदतोड) येणाऱ्या ऊसाला ४१११ रू. प्रतिटन अंतिमदर देण्याचा निर्णय सर्वांनुमते झाला आहे.
या बैठकीला कारखान्याचे जेष्ठ संचालक भीमरावकाका पाटील, संपतराव माने, भीमराव डांगे, सुदाम दीक्षित, सत्वशील कदम, सुनील पाटील, दीपक लिमकर, यशवंत चव्हाण, पृथ्वीराज निकम, अविनाश साळुंखे, सतीश सोलापुरे, दत्तात्रय साळुंखे, संतोष घाडगे, शरद चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन धैर्यशील कदम म्हणाले, आजपर्यंत कारखान्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाची बिले वेळेत वितरित केली आहेत. यापुढेही १ डिसेंबर पासून येणाऱ्या ऊसाला प्रतिटन अंतिमदर ३१११ रु. तर मालकतोडीने येणाऱ्या ऊसाला ऊस, तोडणी, वाहतूक कमिशनसह ४१११ रु. अंतिमदर देण्यात येणार आहे. तसेच या ऊसाची बिले पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाला आहे. तरी वर्धन अॅग्रो कारखाना परिसरातील सर्व ऊस उत्पादक सभासद, शेतकऱ्यांनी, ऊस पुरवठादारांनी आपला ऊस वर्धन कारखान्यास जास्तीत जास्त प्रमाणात पुरवठा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सहवीज प्रकल्प नसताना सुद्धा उच्चांकी दर देण्याचा निर्णय…
वर्धन अॅग्रो कारखान्याने शेतकऱ्यांना उच्चतम दर देण्याचे धोरण अवलंबिलेले आहे. कारखान्याने सहवीज प्रकल्प नसताना सुद्धा उच्चांकी दर देण्याचा निर्णय जाहीर केला असून त्यानुसार १ डिसेंबर २०२३ पासून गाळप होणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३१११ रूपये अतिमदर तर मालकतोडीने येणाऱ्या ऊसाला ४१११ रूपये अंतिमदर देण्यात येणार आहे. त्यामुळे वर्धन अॅग्रो कारखान्याच्या सभासद, ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे
– विक्रमशील कदम,
कार्यकारी संचालक,
वर्धन अॅग्रो कारखाना त्रिमली.