दादांना भेटले, “सायब” अन् रंगला गप्पांचा फड!
'चांगभलं न्यूज'ची पाॅलिटिकल स्टोरी

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
हो! दादांना काल (शुक्रवारी) रात्री “सायब” भेटले अन् बराच वेळ रंगला गप्पांचा फड! गाव होतं कराड तालुक्यातील कालं. म्हणजे काले गाव. आता दादा कोण हे लक्षात आलं असेलच. नसेल तर सांगतो एकेकाळचं राजकारणातील ‘दादा’ व्यक्तीमत्व म्हणजे आपले कालेकर भीमरावदादा! आणि संपूर्ण सातारा जिल्हा ज्यांना साहेब म्हणून ओळखतो ते खा. श्रीनिवास पाटील साहेब!!
भीमरावदादा आणि श्नीनिवास पाटीलसाहेब राजकारणातील एकमेकांचे जुने सहकारी. जनमानसावर दोघांचाही पगडा एकसारखाच. सभा मग ती कोणतीही असो, ती गाजते भीमरावदादा आणि श्नीनिवास पाटील यांच्या अस्सल ग्रामीण बाज असणाऱ्या भाषणांमुळं. आज दोघेही वयाने थकलेत, पण मनातली उर्मी, कार्यकर्ते आणि समाजासाठीची तळमळ दोघांच्याकडे कायम आहे. ती ठासून भरलेली आहे. त्यामुळे या वयातही भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पा मारणं, त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेणं, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं, होतकरू कार्यकर्त्यांना मौलिक सल्ला देणं, मानसिक बळ वाढवणं हे दोघांचं काम अव्याहतपणे सुरू आहे.
एक काळ असा होता की भीमरावदादांच्या सभेला तुफान गर्दी लोटायची. निवडणूक मग ती विधानसभेची असो, लोकसभेची असो की आपल्या कृष्णा कारखान्याची असो. ट्रक-ट्रक भरून माणसं प्रचाराला निघायची. अगोदर छोट्या-मोठ्या गाव पुढाऱ्यांची भाषण व्हायची अन् मग भीमरावदादा भाषणाला उभा राहायचे आणि एकच आरोळी घुमायची ‘काल्याचा वाघ…भीमरावदादा’. मग दादांचं आवेशपूर्ण भाषण सुरू व्हायचं. दादांच्या भाषणाचीही एक स्टाईल असायची, “या निवडणुकीतं असा दणका द्यायचा की…विरोधकांचं डिपाझिट जप्त झालं पाहिजेऽऽऽ’ हा नेहमीचा फेमस डायलॉग दादा म्हटले रं म्हटले की डोक्याला लाल रिबीन बांधलेला एखादा तरूण सभेत मधूनच उठून उभा राहायचा. अन् ‘एकच वादा….’ असं जोरात म्हणायचा. मग लगेच प्रतिसाद देत पब्लिक ‘ऽऽऽभीमरावदादा..!’ असं ओरडायचं. दादांच्या बाबतीत आणखी एक घोषणा फेमस होती, ती म्हणजे ‘जिकडं दादा, तिकडं गुलाल’. बरं दादा नुसतंच हे बोलायचे नाहीत तर करूनही दाखवायचे. कृष्णा काठावर अनेक निवडणुकात त्यांनी अनेकांना ‘पाणी पाजलं’. त्यामुळेच ते सक्रिय राजकारणात होते तोपर्यंत “राजकारणातलं दादा” असा त्यांचा कृष्णाकाठावर दबदबा कायम होता.
गावपातळीपासून जिल्हा पातळीवरील अनेक पदांवर दादा निवडूण गेले होते. सर्वसामान्य माणूस कधी त्याचं प्रशासनातलं एखादं काम घेऊन दादांच्याकडे गेला की ते का होत नाही यासाठी संबंधित अधिकारी नियमांची अडचण सांगायचे, मग निळू फुलेंच्या चित्रपटातील डायलॉग प्रमाणे दादांचा डायलॉग ठरलेला असायचा, ते म्हणत , ” आरं मगं नियम बदल की,. काय बी कर, पण त्या गरीबाचं काम झालं पाहिजे. ध्यानात ठेव त्याला हेलपाटा मारायला लागला नाय पाहिजे’ असं ते बजावीत. त्यामुळे कोणी दादांकडे जातो असं नुसतं जरी म्हटलं तर अधिकाऱ्यांना अगोदरच धडकी भरायची! दादांनी घालून दिलेला हा आदर्श आज राजकारणात येणाऱ्या तरूण कार्यकर्त्यांनी जपला तर तेही नक्कीच खूप मोठे होऊ शकतात.
राजकारणातील दुसरं लोकाभिमुख व्यक्तीमत्व म्हणजे श्नीनिवास पाटीलसाहेब. कॉमेडी, तडका, गुदगुल्या, उकळ्या, चिमटा, मर्म अशी सगळी विशेषणं ज्यांच्या भाषणाला लावली तरी ती कमी पडतात ते साहेब. साहेब बोलायला लागले की पब्लिक कान देऊन ऐकत राहतं. सगळे गडबडून जातात, तिथं पाटीलसाहेब भाव खाऊन राहतात. बरं यांच्याकड गट-तट, आपला-दुसऱ्याचा, सत्ताधारी-विरोधक असला काय प्रकारच नाही. जे शक्य असेल ते काम होणार मग तो कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, भाजपचा असो, शिवसेनेचा असो किंवा आरपीआयचा असो, किंवा इतर इतर छोट्या-मोठ्या कोणत्याही संघटनेचा कोणताही पदाधिकारी असो, तो हक्कानं श्रीनिवास पाटील साहेबांकडे गेला की त्यांचाही ‘शब्द’ पुढे गेलाच समजा. त्यामुळे ते सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना जवळचे वाटतात.
कृष्णा आणि कोयना काठावरची ही राजकारणातली दोन दिग्गज व्यक्तीमत्व. राजकारणातल्या नवख्यांनी त्यांच्याकडून शिकावं असं दोघांचं मुबलक कार्य आणि कर्तृत्व. त्यामुळे या दोघांच्या कालच्या भेटीत काय.. आणि कोणती चर्चा रंगली असेल याचा अंदाज सर्वसामान्यांना येणं जरा अवघडचं. काहीही असलं तरी या गप्पा दिलखुलास आणि मनमोकळ्या झाल्या असतील, जुन्या आठवणी जागवल्या गेल्या असतील आणि हा प्रसंग बघणारे आणि ऐकणारे ही खळखळून हसले असतील. खा. श्नीनिवास पाटीलसाहेब यांनी सोशल मिडियावर लिहिलेल्या पोस्टवरून तरी असंच वाटतंय. असो दोघांनाही दीर्घायुष्य मिळावे अशी कृष्णा-कोयना काठावरील जनतेची मनोमन इच्छा आहे.