साताऱ्यात होणार १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन – changbhalanews
आपली संस्कृतीराज्य

साताऱ्यात होणार १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन

ऐतिहासिक प्रतिसरकारला संमेलनाच्या माध्यमातून होणार अनोखं अभिवादन

सातारा | चांगभलं वृत्तसेवा
विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र यांच्यावतीनं १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव आणि सेक्रेटरी डॉ.जालिंदर घिगे यांनी ही माहिती दिली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त साताऱ्यात संमेलन घेण्याचे ठरले. सातारा येथे यापूर्वी ४ थे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन २००२ मध्ये झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव त्या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष होते. आता २२ वर्षानंतर पुन्हा एकदा साताऱ्यात विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

साताऱ्याच्या प्रतिसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संमेलनाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार आहे. साताऱ्याचे प्रतिसरकार हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, महिला यांना सोबत घेऊन जाणारे होते, त्यांच्या उत्कर्षाचं काम करणारं होते. त्यांनी केवळ घोषणा केल्या नाहीत तर गरिबातील गरिबांना न्याय देण्याच्या दृष्टीनं भूमिका घेऊन सातत्यानं कार्य केले. म्हणून आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळ साताऱ्याच्या प्रतिसरकारला महत्त्व देतो आणि त्यासाठीच सातारला होणारे नियोजित १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन क्रांतिसिंह नाना पाटील व साताऱ्याच्या प्रतिसरकारला आम्ही समर्पित करत आहोत. या संमेलनात लोक साहित्य आणि साताऱ्याचे प्रतिसरकार, वारकरी आणि साताऱ्याचे प्रतिसरकार, साहित्यातील महिलांच्या प्रतिमा व विद्रोही साहित्य, स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्र लढ्यात साहित्यिक, कलावंतांचे योगदान, आदिवासींचे सशस्त्र लढे व स्वातंत्र्य चळवळ, भारतीय संविधानाची 75 वर्षे या अनुषंगानं चर्चासत्र, परिसंवाद तसेच विद्रोही शाहिरी जलसा, कवी संमेलन आयोजित केले जाणार आहेत अशी माहिती प्रवक्ते अविनाश कदम आणि विजय मांडके यांनी दिली.

विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्राच्यावतीनं १४ वे साहित्य संस्कृती संमेलन पुणे येथे १० व ११ डिसेंबर २०२२ रोजी पार पडले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर हे होते. पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलन धारावी (मुंबई) येथे पार पडल्यानंतर कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा, सावंतवाडी, पंढरपूर, धुळे, सोलापूर, इंदापूर, सांगली, राहुरी, बीड, शहादा, पुणे या ठिकाणी संमेलने झाली आहेत. विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ यशवंत मनोहर , प्रा डॉ आ. ह. साळुंखे , डॉ बाबा आढाव, प्रा डॉ बाबुराव गुरव , कॉ नजूबाई गावित , डॉ भारत पाटणकर , कवी वाहरु सोनावणे , रुपा बोधी यांचा या संमेलनात यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू अ‍ॅड. सुभाषबापू पाटील, व्ही. वाय आबा पाटील , प्रसेनजीत गायकवाड , शिवराम सुकी, कॉ अशोक जाधव , ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे, डॉ. बापू चंदनशिवे,प्रा. दिनकर दळवी, प्रा. सुधीर अनवले, ज्योती आदाटे , एडवोकेट सरफराज बागवान , एडवोकेट राजेंद्र गलांडे , प्रा. सीमा मुसळे, शिवराम ठवरे आदी हे संमेलन यशस्वी होण्यासाठी सक्रीय झाले आहेत.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close