
मुंबई-कराड, दि. 24 | चांगभलं वृत्तसेवा
कोयना धरणाच्या डाव्या तिरील पायथा विद्युतगृहाच्या जलविद्युत प्रकल्पासाठी ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या प्रकल्पाचे नियोजन मूळतः कोयना धरणाच्या पूर्वेकडील सिंचनासाठी ३० टीएमसी व उपसा सिंचन योजनांसाठी अतिरिक्त २० टीएमसी पाणी देण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. यासोबतच, कमाल मागणीच्या कालावधीत जलविद्युत निर्मितीस चालना देण्यासाठी आणि धरण पायथ्याच्या वीजगृहांचे रूपांतर करण्यासाठी २x४० मेगावॅट क्षमतेच्या पायथा विद्युतगृह प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.
२०२३ मध्ये शासनाने सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) उदंचन जलविद्युत प्रकल्प व सौर व अन्य अपारंपरिक संकरित प्रकल्पांच्या विकासाचे धोरण निश्चित केले होते. त्यानुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ व महानिर्मिती कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाच्या विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
एकूण १३३६ कोटी ८८ लाख रुपयांच्या खर्चापैकी ८६२ कोटी २९ लाख रुपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून उर्वरित खर्च सिंचन योजनांवर टाकण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे टेंभू, कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजना (ताकारी-म्हैसाळ) यांसारख्या योजनांना २० टीएमसी पाणी विद्युत निर्मितीनंतर सोडले जाणार आहे. यामुळे एकूण २७७.८२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती अपेक्षित असून, राज्याच्या ऊर्जा व सिंचन धोरणाला यामुळे बळकटी मिळणार आहे.